महाराष्ट्र

बॅलेटपेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु

मारकडवाडी: भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित रहावा व बॅलेट पेपरवरच मतदान व्हावे या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल व त्याची सुरुवात मारकडवाडीपासून करु, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार रामहारी रुपनवर, माजी आमदार व राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावकऱ्यांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यकारक निकाल पाहून निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ५८.३३ टक्के मतदान झाले होते, त्याच रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२% तर दुस-या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ६६.०५% मतदान झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. यात ७६ लाख मतदान कसे वाढले, कोणत्या मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मोठ्या रांगा होत्या त्याचे व्हिडिओ चित्रिकरण सादर करा अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही.

लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीच्या योद्ध्यांनी सुरु केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मदतदान घेण्याची मागणी करत आहेत. मारकडवाडीतून सुरु झालेला हा लढा आता राज्यभर पसरु लागला आहे. सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यासह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलने उभी रहात आहेत. ही लढाई आता मारकडवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे. मारकडवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरु आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

मारकडवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले व पोलीसांच्या मदतीने हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. १४४ कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गावकऱ्यांवर दाखल केले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही नाना पटोले यांनी दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

13 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

13 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

13 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

15 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

2 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

2 दिवस ago