क्राईम

सततच्या छळाला कंटाळून महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा खून केला; चाकणमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा

पुणे: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने थेट आपल्या मुलाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली असून, भरवस्तीत घडलेली ही हत्या आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट पाहून पोलीसही चक्रावून गेले होते.

काय आहे प्रकरण?

या घटनेतील मृताचे नाव मुंजा धोंडिबा नरहरे (वय २५) असे असून, मुख्य आरोपी उषा नानासाहेब चव्हाण (वय ४०) हिच्याशी त्याचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात वाद वाढले होते. मुंजा हा उषाला वारंवार शारीरिक मारहाण करत तसेच मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे उषा प्रचंड तणावाखाली होती. अखेर या छळातून मुक्त होण्यासाठी तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

मुलाने रचला खुनाचा कट

उषाने आपला त्रास पुणे शहरात काम करणाऱ्या आपल्या मुलगा निखिल चव्हाण (वय २१) याला सांगितला. आईवर होत असलेला अन्याय समजताच निखिलचा संताप अनावर झाला. त्याने आपल्या आईला या छळातून मुक्त करण्यासाठी मुंजाची हत्या करण्याचा कट रचला. या कटात त्याने आपला मित्र स्वप्नील नरहरी पारधी यालाही सहभागी करून घेतले. ७ जानेवारी रोजी या तिघांनी मिळून हत्येची योजना प्रत्यक्षात उतरवली.

कशी केली हत्या?

योजनेनुसार ७ जानेवारी रोजी उषाने मुंजाला चाकण येथे भेटायला बोलावले. त्यानंतर निखिल आणि स्वप्नील यांनी त्याला दुचाकीवर बसवून मद्यपानासाठी नेले. दारू पिल्यानंतर संधी साधून दोघांनी मुंजावर चॉपरने सपासप वार केले. जागीच त्याचा मृत्यू झाल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी दगडाने त्याचा चेहरा ठेचला. इतकेच नव्हे तर त्याच्याकडील मोबाईल फोन व ओळखपत्रही घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. ११ जानेवारी रोजी चाकण दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंजाचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांनी असा लावला शोध

उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगारांकडे चौकशी सुरू केली.

घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची थोटके आढळून आल्याने तपासाची दिशा ठरली. तपासात खराबावाडी येथील एका दुकानातून ७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता तीन तरुणांनी दारू खरेदी केल्याची माहिती मिळाली. याच धाग्यावरून पोलिसांनी स्वप्नील पारधी याच्या दुचाकीचा शोध घेतला आणि अखेर संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.पोलिसांनी उषा चव्हाण, निखिल चव्हाण आणि स्वप्नील पारधी या तिघांनाही अटक केली असून, त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

7 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

8 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

8 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

8 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

8 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

8 तास ago