नागरिक त्रस्त, सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर–तर्डोबाची वाडी–गोलेगाव–निमोणे–गुनाट–निर्वी, शिंदोडी तसेच शिरूर–रामलिंग–आण्णापूर या मार्गांवर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यांचे अक्षरशः “खड्ड्यांचे साम्राज्य” निर्माण झाले आहे.
वाहनधारकांना दररोज या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. पावसाळा संपला असला तरी या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजूनही दुर्लक्ष करत आहेत. “खड्डे भरण्यासाठी आलेला निधी नक्की जातो कुठे?” असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांना वारंवार तोंडी आणि लेखी स्वरूपात खड्डे भरण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, “ताबडतोब खड्डे न भरल्यास आम्ही उपोषण करू,” असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावर अधिक चीड निर्माण करणारी बाब म्हणजे, सहाय्यक अभियंता जाधव हे वारंवार गैरहजर राहतात, अशी स्थानिकांची तक्रार आहे. कार्यालयात गेले की “साहेब पुण्याला मिटिंगला गेले आहेत” असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये “सहाय्यक अभियंता कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा!” अशी उपहासात्मक टिप्पणी होत आहे.
या सर्व परिस्थितीमुळे शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरावेत, अन्यथा आंदोलन आणि उपोषणाची लढाई उभारली जाईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…