रायगड (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केले आहेत.
राज्यातील अतिधोकादायक घाटांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा एक प्रसिद्ध आणि धोकादायक घाट आहे. हा घाट सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जातो आणि येथील तीव्र वळणे व खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. सुरक्षिततेच्या कारणास्तव, अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात या घाटातून प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाचा निर्णय…
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC), रायगड पोलीस, पोलादपूर तहसील कार्यालय आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागांनी आंबेनळी घाटातील परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे नमूद करत सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची शिफारस केली होती.
आंबेनळी घाट का आहे धोकादायक…?
अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, आंबेनळी घाट हा सह्याद्री पर्वतरांगेतील भूस्खलनप्रवण (Landslide Prone) आणि दरड कोसळण्यास प्रवण (Rockfall Prone) क्षेत्रात मोडतो.
1) घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याचा धोका.
2) उंच कड्यांवरुन मोठे दगड रस्त्यावर पडण्याची शक्यता.
3) झाडे मुळासकट उन्मळून रस्त्यावर पडण्याचा धोका.
4) नैसर्गिक नाले आणि ओढ्यांना पूर आल्याने रस्त्यावरुन पाण्याचा वेगवान प्रवाह.
5) भरावाची माती वाहून जाऊन रस्ता खचण्याची शक्यता.
6) दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका.
7) अतिवृष्टीमुळे अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता दुर्घटना घडण्याची शक्यता.
अशा अनेक गंभीर बाबींचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यापुर्वीही घडल्या आहेत दुर्घटना…
आंबेनळी घाटात पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळणे, झाडे पडणे आणि रस्ता वाहतुकीस अयोग्य होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने यंदाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
घाटात सुरु आहेत सुरक्षा सुधारणा…
सध्या घाट परिसरात विविध सुरक्षा कामे सुरू आहेत. त्यामध्ये
संरक्षक भिंती (Retaining Structures), क्रॅश बॅरिअर्स, ड्रेनेज सुधारणा, उतार स्थिर करण्याची कामे
इतर सुरक्षाविषयक उपाययोजना
यांचा समावेश आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे.
वाहतुकीसंदर्भातील महत्त्वाचे आदेश…
३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. रायगड जिल्ह्यात ऑरेंज किंवा रेड अलर्ट जाहीर झाल्यास हलकी वाहनांची वाहतूकही पूर्णपणे बंद राहील. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत घाटातील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू राहणार.
आदेशाची अंमलबजावणी पोलीस, महसूल व संबंधित यंत्रणांमार्फत केली जाणार आहे.
असा असेल पर्यायी मार्ग…
घाट बंद असल्यामुळे वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.
माणगाव–ताम्हिणी–पुणे–सातारा मार्ग
पोलादपूर–चिपळूण–पाटण–सातारा
–कोल्हापूर मार्ग
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन…
रायगड जिल्हा प्रशासनाने पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना घाट परिसरात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या सूचना, पोलीस प्रशासनाचे निर्देश आणि वाहतूक व्यवस्थेचे पालन करुनच प्रवास करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्रापूर…
सासवड (प्रतिनिधी): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी…
शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवसाढवळ्या…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाच्या…
३.७५ लाखांचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस…
मुंबई : एका सभागृहात "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, फक्त परसेंटेज कमी असावं,"…