महाराष्ट्र

पंचायत समित्यांत भाजपला मित्रपक्षांकडूनच धक्का; जुन्नर-मिरज-हवेलीत वेगवेगळी समीकरणे

महायुतीत अंतर्गत तणाव उघड; स्थानिक राजकारणामुळे भाजप सत्तेबाहेर

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपला धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांत तीन पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला, तर हवेलीत राष्ट्रवादीने अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

जुन्नर पंचायत समितीत दोन्ही शिवसेना एकत्र

पुणे जिल्ह्यातील जुन्नर पंचायत समितीत १६ सदस्यांपैकी शिंदे गट शिवसेनेचे ८, अजित पवार गट राष्ट्रवादीचे ६, भाजपचा १ आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा १ सदस्य निवडून आला होता. सत्ता स्थापनेसाठी ९ सदस्यांची गरज होती.

शिंदे गटाला भाजप किंवा ठाकरे गटाचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र स्थानिक समीकरणे आणि भाजपच्या वरचष्मामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली.

यामध्ये शिंदे गटाच्या कमल शेळकंदे यांची सभापतीपदी, तर ठाकरे गटाचे अमित ढोले यांची उपसभापतीपदी निवड झाली. ठाकरे गटाच्या एकमेव सदस्याने पक्षाच्या आदेशाला डावलून शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने हा निकाल लागला. परिणामी भाजप सत्तेबाहेर राहिला.

मिरजमध्ये शिंदे गटाची काँग्रेसला साथ

सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीत २२ सदस्यांपैकी भाजपने सर्वाधिक १० जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४, काँग्रेस ३, अजित गट ३ आणि शिंदे गट शिवसेनेला २ जागा मिळाल्या.

भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता असतानाच शेवटच्या क्षणी शिंदे गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.यामुळे काँग्रेसच्या अवघ्या २१ वर्षांच्या तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतीपदी, तर शिंदे गटाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. भाजपचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरी मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे सत्ता हुकली.

हवेलीमध्ये राष्ट्रवादी-अपक्षची सत्ता

पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी ७ सदस्यांची आवश्यकता होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागा, भाजपने ४, तर शिंदे गट शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी १ जागा जिंकली.

राष्ट्रवादीला बहुमतासाठी एका मताची गरज होती. अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने युवराज हिरामण काकडे यांची सभापतीपदी आणि विद्या गायकवाड यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

या तीन घटनांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्टपणे समोर आला आहे. स्थानिक नेते आणि राजकीय समीकरणांमुळे मित्रपक्षांनी भाजपला बाजूला ठेवत सत्ता समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील स्थानिक राजकारणात नवी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

13 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

20 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

20 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

20 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

20 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

21 तास ago