महाराष्ट्र

पंचायत समित्यांत भाजपला मित्रपक्षांकडूनच धक्का; जुन्नर-मिरज-हवेलीत वेगवेगळी समीकरणे

महायुतीत अंतर्गत तणाव उघड; स्थानिक राजकारणामुळे भाजप सत्तेबाहेर

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपला धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांत तीन पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला, तर हवेलीत राष्ट्रवादीने अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

जुन्नर पंचायत समितीत दोन्ही शिवसेना एकत्र

पुणे जिल्ह्यातील जुन्नर पंचायत समितीत १६ सदस्यांपैकी शिंदे गट शिवसेनेचे ८, अजित पवार गट राष्ट्रवादीचे ६, भाजपचा १ आणि उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा १ सदस्य निवडून आला होता. सत्ता स्थापनेसाठी ९ सदस्यांची गरज होती.

शिंदे गटाला भाजप किंवा ठाकरे गटाचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र स्थानिक समीकरणे आणि भाजपच्या वरचष्मामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली.

यामध्ये शिंदे गटाच्या कमल शेळकंदे यांची सभापतीपदी, तर ठाकरे गटाचे अमित ढोले यांची उपसभापतीपदी निवड झाली. ठाकरे गटाच्या एकमेव सदस्याने पक्षाच्या आदेशाला डावलून शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने हा निकाल लागला. परिणामी भाजप सत्तेबाहेर राहिला.

मिरजमध्ये शिंदे गटाची काँग्रेसला साथ

सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीत २२ सदस्यांपैकी भाजपने सर्वाधिक १० जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी (अजित पवार गट) ४, काँग्रेस ३, अजित गट ३ आणि शिंदे गट शिवसेनेला २ जागा मिळाल्या.

भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता असतानाच शेवटच्या क्षणी शिंदे गटाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.यामुळे काँग्रेसच्या अवघ्या २१ वर्षांच्या तन्वी सुनील कमलेकर यांची सभापतीपदी, तर शिंदे गटाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. भाजपचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली असली तरी मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे सत्ता हुकली.

हवेलीमध्ये राष्ट्रवादी-अपक्षची सत्ता

पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी ७ सदस्यांची आवश्यकता होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागा, भाजपने ४, तर शिंदे गट शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी १ जागा जिंकली.

राष्ट्रवादीला बहुमतासाठी एका मताची गरज होती. अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने युवराज हिरामण काकडे यांची सभापतीपदी आणि विद्या गायकवाड यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

या तीन घटनांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्टपणे समोर आला आहे. स्थानिक नेते आणि राजकीय समीकरणांमुळे मित्रपक्षांनी भाजपला बाजूला ठेवत सत्ता समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील स्थानिक राजकारणात नवी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

17 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

17 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

17 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

17 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

19 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

19 तास ago