कऱ्हाड: राज्यापासून गावपातळीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसचा या गटात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा या मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील गावांचा समावेश होतो. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मतदारसंघातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे निवास थोरात यांना निवडून दिले. त्यातून त्या गटावर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मनोज घोरपडे विजयी झाले, तर कऱ्हाड दक्षिणेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले हे निवडून आले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व असल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली.
विकासकामे व्हायची असतील, तर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, या भूमिकेवर नेते, कार्यकर्ते आले. नेमक्या याच संधीचा फायदा भाजपचे कऱ्हाड उत्तरमधील नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनी उठवला. त्यांनी कोपर्डे हवेली गटातील काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ताकद देण्याचा प्रयत्न केला. कऱ्हाड उत्तरमधील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील नेत्यांसह कार्यकर्ते ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत सामील झाले. त्यामुळे कऱ्हाड उत्तरेतील काँग्रेसला उतरती कळा लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नेते कऱ्हाड उत्तरेतील काँग्रेसमध्ये शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.
आमदारांची अनुपस्थिती चर्चेची
भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात कऱ्हाड उत्तर मतदारसंघातही अनेकांचे पक्षप्रवेश केले जात आहेत. त्या कार्यक्रमासाठी मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. भोसले, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाला कऱ्हाड उत्तरचे भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही आखली रणनीती
राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे खचून न जाता माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेनंतर झालेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत दांडग्या जनसंपर्काची, कार्यकर्त्यांच्या ताकदीची चुणूक दाखवून देऊन सह्याद्री कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली. त्यांनी विधानसभेच्या पराभवाने खचून न जाता निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून जनसंपर्क वाढवला. सह्याद्री कारखान्याच्या निकालाने त्यांचा गट चार्ज झाला. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखून तयारी केली आहे. त्यासाठी पक्षातील एकही नेता आगामी निवडणुकांच्याअगोदर भाजपच्या गळाला लागू नये, यासाठी त्यांच्या पक्षाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून त्यांनी पक्षाची ताकद आहे, त्यापेक्षा कमी न होता ती वाढवण्यासाठी बेरजेच्या राजकारणावर भर दिल्याचे दिसते.
उंडाळकरांचे सैन्य अजितदादांच्या तंबूत
कऱ्हाड दक्षिणचे सलग ३५ वर्षे आमदार म्हणून काम केलेले माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातही आपला गट तयार केला होता. त्यांचा कऱ्हाड उत्तरमध्येही गट होता. सहकारी संस्थांच्या माध्यमातून उत्तरेतील नेत्यांसह कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी गट कार्यरत ठेवला आहे. त्यांचा अजूनही कऱ्हाड उत्तरमध्ये गट कार्यरत आहे. (कै.) उंडाळकर यांच्यानंतर त्याचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे रयत संघटनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कऱ्हाड उत्तरेत काँग्रेसचे उंडाळकर गटाचे नेते, कार्यकर्तेही अजिदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे तेथेही काँग्रेसला फटका बसला आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…