ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिलाताई पिंपळोदकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले की, शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे. शिक्षण ही केवळ नोकरी मिळविण्याची प्रक्रिया नसून चांगला नागरिक घडविण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत आनंदाने आणि आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या भूमिकेचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, आई-वडील जन्म देतात; मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, “मी याच शाळा क्रमांक २३ चा विद्यार्थी होतो. परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते,” असे सांगितले. तसेच महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन केले.
देशाचे पंतप्रधान Narendra Modi, माजी राष्ट्रपती A. P. J. Abdul Kalam आणि अणुशास्त्रज्ञ Anil Kakodkar यांसारखी अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे सामान्य शाळांतून घडल्याचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.
मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढविते, असे नमूद करत त्यांनी मैदानी खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर राहून खेळ आणि अभ्यास यांचा समतोल राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानामुळे शाळांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडून आल्याचे सांगत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी शाळांमधील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांवर विशेष भर देत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. शाळांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, शिक्षक आणि पालकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …