जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची नावे निमंत्रण पत्रिकेत आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय सावकारे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल तसेच खासदार सुप्रिया सुळे आदी नेत्यांचीही उपस्थिती अपेक्षित असल्याचे पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे खडसेंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध राजकीय प्रवाहांतील नेते एकत्र येण्याचे चित्र आहे.
फडणवीस-खडसे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. मात्र, भाजपमधून बाहेर पडल्यानंतर खडसे आणि भाजप नेतृत्वातील संबंध अनेकदा चर्चेत राहिले. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा सातत्याने झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट रोजी कोथळी येथे होणाऱ्या कार्यक्रमात फडणवीस आणि खडसे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमातून दोन्ही नेत्यांकडून कोणते राजकीय संकेत दिले जातात, याचीही उत्सुकता आहे.
महाजन उपस्थित राहणार का?
निमंत्रण पत्रिकेत मंत्री गिरीश महाजन यांचेही नाव प्रमुख अतिथींमध्ये आहे. खडसे आणि महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे.
महाजन यांनी यापूर्वी पत्रकारांशी बोलताना काही कारणांमुळे खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत नाव असले तरी महाजन प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात मंत्री, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ आमदार म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. मात्र, दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम केवळ सत्कार समारंभ न राहता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
पुणे : अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ‘कारेश्वर भिशी’च्या नावाखाली तब्बल…
मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची…
मुंबई : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड…
मुंबई: देशातील राजकीय वातावरण बदलले असून जनता आता भाजपा-मोदी-शाह सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सरकार घाबरले…