चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक आणि रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणारी कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, २१ ऑगस्टपासून रस्त्यावर दुचाकीसह कोणतेही वाहन उभे केल्यास ते थेट जप्त केले जाणार आहे. वाहतूक नियमनासाठी पोलिसांना एमएसएफचे १०० जवान उपलब्ध करून देण्यात येणार असून, दोन पाळ्यांमध्ये पोलीस आणि जवान वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
चाकणकडे जाणाऱ्या ट्रकसह अवजड वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन मार्गिका वाहतुकीसाठी बंद होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर उपाय म्हणून एमआयडीसीच्या मोकळ्या तसेच गायरान जागांचा पार्किंगसाठी नियोजनबद्ध वापर करण्यात येणार आहे. तळेगावपासून भंडारा डोंगर परिसरापर्यंत उपलब्ध असलेल्या जागांचा यासाठी उपयोग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
दोन महिन्यांत २९ जणांचा मृत्यू
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न केवळ कोंडीपुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या सुरक्षिततेशीही जोडला गेला आहे. रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने मागील दोन महिन्यांत २९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर रस्त्यांच्या विकासात पावसाळी गटारांसोबत पदपथांची निर्मिती केली जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी योग्य ठिकाणी क्रॉसिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
अनधिकृत डिव्हायडर कट बंद होणार
राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. अनधिकृत ठिकाणी वाहनांना यू-टर्न घेण्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होण्यासोबतच अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे नियमानुसार आवश्यक त्या ठिकाणीच प्रवेश आणि वळणाची व्यवस्था ठेवली जाणार आहे.
पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य
चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या विकासात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पादचारी क्रॉसिंग यांसारख्या सुविधांवर भर दिला जाणार आहे. मागील काळात रस्ते अपघातांमध्ये झालेली जीवितहानी लक्षात घेता पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
नवीन कामांना वाहतूक अभ्यासानंतरच परवानगी
राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी, रेल्वे यांसह विविध शासकीय संस्थांची आगामी कामे परिसरात सुरू होणार आहेत. मात्र या कामांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच संबंधित विभागांना काम सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
वाहतुकीशी संबंधित सर्व निर्णय वैज्ञानिक पद्धतीने आणि उपलब्ध आकडेवारीच्या आधारे घेतले जात असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.
गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक…
मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी…
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.…
काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे…
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे…
मुंबई: पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने उभारण्यासाठी बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्याची…