महाराष्ट्र

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान…

जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान राज्याला हे यश मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका, त्यांचे सहकार्य महत्वाचे ठरल्याचे सांगून त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान, स्वाभिमान बाळगणाऱ्या तमाम महाराष्ट्रवासियांचे अभिनंदन करुन या ऐतिहासिक क्षणांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार मावळ्यांना संघटीत करुन महाराष्ट्राच्या मातीत रयतेचे राज्य, शेतकऱ्यांचे स्वराज्य निर्माण केले. रयतेचे राज्य स्थापन करण्याचा ध्यास घेऊन लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना याच किल्ल्यांनी भक्कम साथ दिली होती. महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पाहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे विचार, मराठी मावळ्यांचा पराक्रम जगभरात पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजतील. ऐतिहासिक वारशाचा गौरव लाभलेल्या या बारा किल्ल्यांसह राज्यातील सर्वच किल्ल्याचे संरक्षण, संवर्धन करण्यासह त्यांचे महत्व, तिथे घडलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केलेल्या राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे केवळ दगडधोंड्यांचे बांधकाम नाही, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे भक्कम बुरुज आहेत. आज त्यांना जागतिक दर्जा मिळाल्याने स्वराज्याच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्यातील दुर्ग दुर्गेश्वर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी हे ११ किल्ले शिवकालीन सामरिक रणनीती, अद्वितीय स्थापत्यकौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहेत. या यशासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने प्रस्ताव तयार केला होता. पंतप्रधान कार्यालयाने “मराठा लष्करी स्थापत्य” प्रस्तावाची निवड करून युनेस्कोकडे पाठवली. या यशात राज्यसरकारच्या प्रयत्नांबरोबरच केंद्रसरकारच्या नेतृत्वात झालेल्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना मोलाचे यश मिळाले आहे असे अजित पवार म्हणाले.

युनेस्कोकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा सन्मान नाही, तर ती पर्यटन, स्थानिक रोजगार, संशोधन आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. महाराष्ट्रातील गडकोटांभोवती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी नवीन अर्थव्यवस्था निर्माण होण्याची दिशा या निर्णयामुळे निश्चित झाली आहे. शिवकालीन गडकोटांना युनेस्कोकडून मिळालेली मान्यता ही आपल्या संस्कृतीचा, स्वराज्य संकल्पनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जागतिक स्वीकार आहे. हे महाराष्ट्रासाठी एक तेजस्वी पर्व आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेली ही दुर्गशक्ती आता जागतिक मंचावर मानाने झळकणार असल्याची आनंदाची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

5 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

5 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

6 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

14 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

14 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

14 तास ago