मुंबई: खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत.
कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
शेतक-यांनी सदर व्हट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सुचना मुंडे यांनी यावेळी दिल्या. कापुस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाचे अनधिकृत बियाणे विक्री होतात. यासाठी महाराष्ट्रात असलेला महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० अंतर्गत शेतकरी तक्रारी करतात. हजारो दावे आज उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. कंपन्यांवर कारवाई होत नाही आणि तक्रार करणारा शेतकरी यात भरडला जातो. त्यामुळे हा कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे. शेतक-यांना त्वरीत न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज असुन त्याचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिलेत.
कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी, असेही मुंडे यांनी सांगितले. तसेच बियाण्यांच्या तक्रारीबाबत ओरिसाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्यात यावे, अशी सूचना केली.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…