मुंबई : वरळी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत विशेष आढावा बैठक घेतली. बैठकीत वरळीतील आरोग्य, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या जोडणीसह विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
धोबीघाट येथील महापालिकेच्या जागेवर मोफत प्रसूतिगृह आणि लहान मुलांसाठी विशेष रुग्णालय उभारावे, अशी मागणी अहिर यांनी केली. माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी पूर्ण क्षमतेने सुरू करून अंत्यसंस्कारावेळी होणाऱ्या धुराचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी धूर बाहेर जाण्याची व्यवस्था दुरुस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासमोरील रस्त्यांवरील अडथळे दूर करून फूटपाथ समपातळीवर आणावा, तसेच कोस्टल रोड परिसरातील पदपथ आणि उद्यानांची नियमित देखभाल व सुशोभीकरण करावे, असे निर्देश देण्यात आले. रिलायन्समार्फत सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामासोबतच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या परिसराकडेही योग्य लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाजवळील डेब्रिज हटवून जागा मोकळी करावी. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतरही एमएमआरडीएने काही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केलेली नसल्याचा मुद्दाही अहिर यांनी उपस्थित केला.
सात रस्ता येथील मोनोरेल ब्रिज मेट्रो स्थानकाशी अद्याप जोडला गेलेला नसल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत आहे. ही जोडणी तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच महापालिकेच्या वाहनतळांवरील पे अँड पार्कचे दर कमी करून स्थानिक नागरिकांना सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली.
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडचा नवीन सुधारित आराखडा तयार करण्याची मागणीही अहिर यांनी केली. बैठकीत मांडलेल्या सर्व प्रश्नांची दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकाबाबतही चर्चा
मुंबईत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांच्या सहकार्याने विधान भवनात समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. या समितीच्या अध्यक्षस्थानी सचिन अहिर होते. स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा केली.
वरळीचा विकास करताना स्थानिक नागरिकांचे हित, मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन सुरक्षित ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांचे उपायुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…
२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…
किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…
पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…