महाराष्ट्र

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा

ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी केले.

ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, ठाणे-पालघरसह विविध विधानपरिषद मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना मिळालेला पाठिंबा हा राज्यातील जनतेचा महायुतीवरील वाढता विश्वास दर्शवणारा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांसह महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्व १७ उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाणे-पालघर मतदारसंघाची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिल्याचे सांगताना त्यांनी यापूर्वी दिवंगत वसंत डावखरे यांनाही बिनविरोध निवडून देण्यात आले होते, याची आठवण करून दिली. निवडणूक झाली असती तरी महायुतीकडे स्पष्ट बहुमत होते, मात्र सर्वानुमते निर्णय झाल्याने ठाण्याची राजकीय परंपरा जपली गेली, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीत मतभेद आणि गटबाजी उघड झाली असून अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतल्याने विरोधकांची कमकुवत स्थिती स्पष्ट झाली आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि आता विधान परिषद निवडणुकांमध्येही विरोधकांतील विसंवाद दिसून आल्याचा दावा त्यांनी केला.

महायुतीतील समन्वयाचे उदाहरण देताना रायगडमध्ये महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख त्यांनी केला. पुणे, संभाजीनगर आणि इतर ठिकाणीही पक्षहितासाठी उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीतील एकजूट अधिक मजबूत झाल्याचे ते म्हणाले.

नाशिक आणि जळगाव विधान परिषद मतदारसंघांमध्येही सकारात्मक चर्चा सुरू असून तेथेदेखील सर्वानुमते निर्णय होण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अर्ज भरण्याच्या वेळी व्यक्त केलेला १७ जागांच्या विजयाचा विश्वास आता अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात २०२२ पासून महायुती सरकारने विकासाला गती दिली असून केंद्रातील पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सातत्याने पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू असून शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील महत्त्वाकांक्षी क्लस्टर पुनर्विकास योजना ही देशातील सर्वात मोठ्या परिवर्तनकारी योजनांपैकी एक असून आधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज रस्ते, उद्याने, शाळा, रुग्णालये आणि अन्य नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व तयारीबाबत प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सतर्क असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांच्या कामकाजाचा सातत्याने आढावा घेतला जात असून प्रत्येक मंत्र्याने आपल्या खात्याला आणि मतदारसंघाला न्याय देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, यापूर्वी त्यांच्या पत्नीही महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. आता स्वतः रवींद्र फाटक विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आले असून हा एक सुखद योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

7 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

8 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

8 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

8 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

9 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

12 तास ago