मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न; १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान
मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचा भक्कम पाया असून, या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची भावना विकसित होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींची परंपरा या विद्यापीठाला लाभली आहे. नवस्नातकांनी या परंपरेचा वारसा पुढे नेत देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
२१व्या शतकातील वेगवान बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकणे आवश्यक असल्याचे सांगून, राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुतूहल व नवोपक्रम भारताच्या प्रगतीचा पाया; डॉ. अजय कुमार सूद
प्रमुख पाहुणे डॉ. अजय कुमार सूद यांनी नवस्नातकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रम यांवर आधारित शिक्षणच भारताला जागतिक नेतृत्वाकडे घेऊन जाईल. कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज आणि प्रयोगाधारित शिक्षण या बदलांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रमामुळे संशोधनाचे लोकशाहीकरण होत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0 च्या माध्यमातून आरोग्य, शेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात मोठे परिवर्तन शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
१ लाख ७२ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदव्या
यंदाच्या दीक्षान्त समारंभात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १ लाख ७२ हजार ५२२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८४ हजार ३१८ मुले, ८८ हजार २०२ मुली आणि २ इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
६०२ पी.एचडी पदव्या, १९ विद्यार्थ्यांना पदके
यावर्षी ६०२ विद्यार्थ्यांना पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ पदके आणि २ स्पर्धा पारितोषिके प्रदान करण्यात आली.
डिजिलॉकरवर प्रमाणपत्रे उपलब्ध होणार
दीक्षान्त समारंभानंतर विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि ABC आयडीशी संबंधित क्रेडिट्स डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…