इंदापूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आंदोलन, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली; मात्र संबंधित तरुणीने २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. तिने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपहरणाची तक्रार; चार दिवसांवर लग्न
१७ फेब्रुवारी रोजी, लग्नाला अवघे चार दिवस शिल्लक असताना, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकून तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. संशयित आरोपी हा शेजारी राहणारा तरुण असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पाच ते सहा विशेष पथके तयार केली होती.
तरुणीचा जबाब; कुटुंबाचा विरोध
दरम्यान, तरुणीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात अपहरण झाल्याचा इन्कार करत ती स्वतःहून गेल्याचे म्हटले. मात्र, तिच्या आईने हा जबाब दबावाखाली दिल्याचा आरोप केला असून मुलीला व कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा केला आहे. यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
राजकीय आरोप; घोषणाबाजीने तापला परिसर
या प्रकरणात भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर आरोपींना पाठबळ असल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत. आरोपीचा चुलता हा आमदारांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी तरुणीला नेण्यात आले असता ‘राहुल कुल मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदारांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR)ची चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी भिगवणमध्ये भेट देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते; मात्र पोलिसांनी मज्जाव केल्याने मोर्चा काढता आला नाही. आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी करत मुलीला आईच्या ताब्यात द्यावे, असे पडळकर यांनी म्हटले.
धर्मीय रंगामुळे वाढला तणाव
तरुणी हिंदू तर संशयित मुस्लिम समाजातील असल्याने प्रकरणाला धार्मिक रंग चढला. सोशल मीडियावरही विविध पोस्ट, फोटो आणि स्टेटस व्हायरल झाल्याने वातावरण अधिक तापले. भिगवण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढवला आहे.
सन्मानाने जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
सदर तरुणी २१ वर्षांची असल्याने कायद्याने सज्ञान आहे. तिच्या इच्छेला प्राधान्य द्यावे की कुटुंबाच्या आक्षेपांचा विचार करावा, यावर चर्चा सुरू आहे. एका बाजूला मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला समाजातील दबाव, प्रतिष्ठा आणि धार्मिक भावना यांचा संघर्ष उघड झाला आहे.
या घटनेने आंतरजातीय व आंतरधर्मीय संबंधांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आंदोलन आणि राजकीय आरोपांपेक्षा तरुणीच्या सुरक्षिततेला, समुपदेशनाला आणि कायदेशीर प्रक्रियेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…