गॅस तुटवड्याने जनतेची तडफड; बाळासाहेबांच्या शिवसेनेची आठवण पुन्हा जागी
मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल, मेस, घरगुती स्वयंपाक व्यवस्था अडचणीत आली आहे. काही भागात काळाबाजारही वाढल्याच्या तक्रारी समोर येत असून नागरिकांना मातीच्या चुली किंवा लाकडावर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात असले तरी पुरवठा, नियोजन आणि माहितीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अन्नाशी संबंधित हा प्रश्न गंभीर बनत असताना स्थानिक पातळीवर जनप्रतिनिधी आणि कार्यकर्ते पुढाकार घेताना फारसे दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह यासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांनी अंतिम युक्तिवादासाठी तयारी दर्शवली असून पुढील तारीख लेखी युक्तिवाद पाहून निश्चित केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शिवसेना दोन गटांत विभागल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ तर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे. मात्र या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेकांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील कार्यकर्त्यांची आक्रमक आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढणारी शिवसेना आठवत असल्याचे बोलले जात आहे.
भूतकाळात रेशनिंगवरील तुटवडा, काळाबाजार किंवा जनतेच्या प्रश्नांवर शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून आवाज उठवत असत, अशी आठवण नागरिक व्यक्त करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत मात्र सर्वसामान्यांच्या अडचणींवर तातडीने काम करण्यासाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
गॅस तुटवड्यामुळे घरगुती वापरासह हॉटेल, उद्योग, शाळा-हॉस्टेलमधील मेस व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याने प्रशासनाने पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरजही अधोरेखित होत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…