शिरूर (अरुणकुमार मोटे): जगभरातील विविध भागांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शिरूर महसूल प्रशासनाने एलपीजी गॅस व इंधन साठ्याचा आढावा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पुरवठा नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने यांनी तहसील कार्यालयात तालुक्यातील एलपीजी गॅस वितरक, पुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.
बैठकीत तालुक्यातील घरगुती तसेच व्यावसायिक गॅस साठा, वितरण व्यवस्था, उपलब्धता आणि संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठीची तयारी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन, गॅस आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनावश्यक साठेबाजी किंवा पॅनिक बुकिंग होण्याची शक्यता असते, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी वितरकांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, तालुक्यातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांपर्यंत वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने गॅस पोहोचला पाहिजे. वितरकांनी उपलब्ध साठ्याची अद्ययावत माहिती प्रशासनाला नियमित द्यावी तसेच पुरवठा साखळीत अडचण आल्यास तात्काळ कळवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत घरगुती ग्राहकांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन एलपीजी सिलिंडरवर अवलंबून असल्याने गॅस पुरवठ्यात व्यत्यय आल्यास नागरिकांच्या स्वयंपाकघरावर थेट परिणाम होऊ शकतो. तसेच हॉटेल, खानावळी, मिठाई व्यवसाय, केटरिंग सेवा आदी व्यावसायिक घटकांची गरज लक्षात घेऊनही सुसूत्र नियोजन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत नायब तहसीलदार सदाशिव व्हणमाने म्हणाले, “युद्धामुळे गॅस सिलिंडर किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. तालुक्यात सध्या पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक पॅनिक बुकिंग करू नये.”
दरम्यान, संकटकाळात अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होऊ नये यासाठीही प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी, जादा दर आकारणी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी दिला.
एकूणच, संभाव्य संकटाची दखल घेत शिरूर प्रशासनाने आधीच खबरदारी घेतल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता गरजेनुसारच गॅसची मागणी करावी आणि कुठेही गैरप्रकार आढळल्यास प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…