नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अशा व्यक्तीने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते, तर स्वराज्य उभे राहिले नसते. सत्ताधारी नेते अशा लोकांच्या पायाशी जात असल्यामुळेच त्यांची मस्ती वाढली असून ते वारंवार अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री तात्काळ का बोलले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. तसेच, शिवप्रेमी असल्याचा दावा करणारे काही नेते आता शांत का आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. विरोधात असताना एसटी विलीनीकरणासाठी आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते सत्तेत आल्यानंतर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तेलंगणा सरकारने एसटीचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या, तर महाराष्ट्रात ते का शक्य होत नाही, असा सवाल त्यांनी केला. एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, काही चुका झाल्याने सत्ता गेली असली तरी आता परिस्थिती बदलत आहे. महापालिकेतील अनेक नगरसेवक संपर्कात असून लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपचा बालेकिल्ला ढासळण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीबाबत विचारले असता, यावर संबंधित नेतेच बोलू शकतात, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. मात्र, काही सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकीय जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…