शिरुर तालुक्यात भरधाव कंटेनरने पिकअपला चिरडलं; दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आंधळगाव परिसर रविवार (दि 10) पहाटे भीषण अपघाताने हादरला. ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, तर या अपघातात महिला, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसह १४ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा गंगाराम पवार (रा. राहू, ता. दौंड) हे महिंद्रा पिकअप (MH 42 BF 0699) घेऊन ऊसतोड कामगारांना घेऊन जात होते. रविवारी पहाटे ५:२० वाजण्याच्या सुमारास आंधळगाव येथील सीएनजी पंपासमोर न्हावरा-चौफुला मार्गावर समोरून आलेल्या अशोक लेलंड कंटेनरने (MH 12 NX 2919) भरधाव वेगात पिकअपला जोरदार धडक दिली.

यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसर दणाणून गेला. पिकअपचा चक्काचूर झाला असून वाहनातील कामगार अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. काही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर लहान मुलांच्या आक्रोशाने परिसर हेलावून गेला. या भीषण अपघातात संगीता सुनील मोरे (वय ३५) आणि रविन सखाराम सोनवणे (वय ४५) या दोघांचा मृत्यू झाला. संगीता मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रविन सोनवणे यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या अपघातातील जखमींमध्ये तीन ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. ऊसतोडीसाठी घरदार सोडून आलेल्या या मजुरांवर अचानक काळानेच घाला घातल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक अनिल सुभाष वानखेडे हा घटनास्थळावरून फरार झाला. जखमी व्यक्ती रस्त्यावर तडफडत असताना चालकाने मदतीऐवजी पळ काढल्याने संतप्त नागरिकांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गरीब मजुरांचे जीव इतके स्वस्त झालेत का…?

दरवर्षी ऊसतोड कामगारांना जनावरांसारखे पिकअप, ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांमध्ये कोंबून नेले जाते. ना सुरक्षेची हमी, ना नियमांचे पालन! प्रशासन मात्र अपघात झाल्यावरच जागे होते. निष्पाप मजुरांच्या मृत्यूनंतर काही दिवस कारवाईचा दिखावा होतो आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, अशी सर्व स्तरातुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाहतूक विभाग आणि पोलिसांची जबाबदारी कोण ठरवणार…?

न्हावरे-चौफुला मार्गावर अवजड वाहनांचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. बेफाम कंटेनर, नियमबाह्य प्रवासी वाहतूक आणि निष्क्रिय यंत्रणा यामुळे हा मार्ग “मृत्यूचा कॉरिडॉर” बनत चालल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोडाच्या उसळी चांगल्या असल्या तरी प्रमाणातच खाव्यात

मोड आलेली कडधान्यं रोज खाण्याची सवय हेल्थी फॅशन म्हणून रूढ होते आहे, पण कोणतीही गोष्ट…

2 दिवस ago

निवांत झोप आणि आरोग्याचं नात

चांगल्या झोपेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. झोप कमी पडणे आणि यामुळे…

2 दिवस ago

भरती प्रक्रियेतील नव्या सुधारणांवरून राज्यात वाद; सामाजिक प्रतिनिधित्व धोक्यात येण्याची भीती

मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड…

2 दिवस ago

पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा यांची रणनीती यशस्वी; जनतेने विकासाला कौल दिला; एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: पंतप्रधान Narendra Modi यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची चाणक्य नीति…

2 दिवस ago

सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला…

2 दिवस ago

दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे

दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात; विशेषत: महिलांसाठी. तज्ज्ञ…

3 दिवस ago