शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाचा पाणी प्रश्न भविष्यात पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन या धरणातुन नगर तालुक्यातील गावांसाठी होणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरुर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. तसेच हि योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील चिंचणी गावात घोड धरण असुन या धरणाचा पाणीसाठा सुमारे ७ टीएमसी आहे. या धरणाच्या पाण्यामुळे शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक गावे जलसिंचनाखाली आलेली आहेत. या धरणामधून दोन कालवे असून, एक श्रीगोंदा तालुक्यातील गावातील मूळ लाभार्थ्यांसाठी आहे, तर दुसरा शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, तसेच याच धरणामधून पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा होत आहे. तसेच अनेक पिण्याच्या पाणीपुरवठा योजना तसेच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपसा जलसिंचन योजना आहेत.
शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या साकळाई उपसा जलसिंचन योजनेस तीव्र विरोध सुरु केला असुन साकळाई जलसिंचन योजनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी, चिखली यासह इतर ३२ गावे ओलिताखाली आणण्याचा सरकारचा मानस आहे. या उपसा सिंचन योजनेसाठी १.८ टीएमसी म्हणजेच सुमारे २ टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनदेखील योजनेचा हेतू सफल होण्याबद्दल शांशकता निर्माण होत आहे.
कारण ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार…?
आधीच या धरणातुन शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे सरकारने अशा पद्धतीचा नाहक खर्च करू नये. त्यापेक्षा कुकडी कालव्यातून विसापुर धरणात पाणी सोडून त्यातून सदर योजना राबविल्यास जास्त लाभदायक व कमी खर्चात यशस्वी योजना राबविता येईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तर धरणग्रस्त शेतकरी आंदोलन करणार…?
उन्हाळ्यामध्ये घोड धरणातून होत असलेल्या कालव्यातील आवर्तनांना मुळात आत्ताच मोठ्या प्रमाणात अडचण येत असून, मे महिन्यात पिके अडचणीत येत असतात. अशातच आता नवीन साकळाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाल्यास या धरणावर अवलंबून असलेले शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिंदोडी, निमोणे, गोलेगाव, तर्डोबाची वाडी येथील धरणग्रस्त शेतकरी यांनाही याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच या धरणाच्या दोन्ही कालव्यांवरचे मूळ लाभार्थी शेतकरी यांनाही पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.
शिरुर व श्रीगोंदा तालुक्यांतील मूळ लाभार्थी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा साकळाई जलसिंचन योजनेला विरोध असुन शासनाने ही योजना बळजबरीने लादल्यास शिरुर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करतील, याची दक्षता शासनाने घ्यावी, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार संतोष काळे, शेतकरी सुभाष पवार, हरिचंद्र पवार, संदीप सूर्यवंशी, प्रदीप काळे, माउली नागावडे, वसंत रोकडे, अनिल ओव्हाळ उपस्थित होते.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…