मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर सोशल मीडियावर एक गोंधळजनक माहिती व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर या प्रकरणावर संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सत्य परिस्थिती समोर आणली आहे.
नेमका गोंधळ कुठे झाला?
बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या ‘लिअरजेट ४५’ या खासगी विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर विमानाचं ‘मूव्हमेंट लेटर’ सोशल मीडियावर व्हायरल झालं. या कागदपत्रावर कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश अशी पायलट्सची नावे नमूद होती. हे पत्र पाहून अनेकांनी खातरजमा न करता कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.
पत्नीची भावूक पोस्ट: “माझे पती सुरक्षित आहेत”
कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजाम सहनी यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अफवांवर स्पष्टीकरण दिलं.“कृपया या चुकीच्या बातम्या थांबवा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत,” असं भावूक आवाहन त्यांनी केलं.या पोस्टनंतर सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला.
ऐनवेळी पायलट बदलल्यामुळे झाला गैरसमज
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणाच्या अगदी शेवटच्या क्षणी विमानाच्या वैमानिकामध्ये बदल करण्यात आला होता. मूळ नियोजनानुसार कॅप्टन साहिल मदान हे विमान चालवणार होते. मात्र ऐनवेळी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे देण्यात आली.दुर्दैवाने, ज्या विमानाचं नेतृत्व कॅप्टन सुमित कपूर यांनी केलं, त्याच विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या दुर्घटनेतील मृतांची अधिकृत नावे
अजित पवार – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विदिप जाधव – सुरक्षा रक्षक
कॅप्टन सुमित कपूर – मुख्य वैमानिक
शांभवी पाठव – सह-वैमानिक
पिंकी माळी – फ्लाईट अटेंडंट
एकीकडे राज्याने एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असताना, दुसरीकडे सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मात्र कॅप्टन साहिल मदान यांच्या पत्नीने वेळेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या गोंधळामागचं सत्य स्पष्ट झालं आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…