बीड: बीड जिल्ह्यात बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटावर एक परीक्षा केंद्र तर प्रत्यक्ष परीक्षा मात्र दुसऱ्याच ठिकाणी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
परळी तालुक्यात एकूण ११ परीक्षा केंद्रांवर सुमारे ५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. सकाळी ११ वाजता पहिला पेपर सुरू झाला. मात्र, ज्या शाळेला अधिकृत परीक्षा केंद्राचा दर्जा नाही, त्या शारदा माध्यमिक व प्राथमिक विद्यालय, जिरेवाडी येथे यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी त्या शाळेतील नियमित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘पेपरवर कॉलेज, प्रत्यक्षात अस्तित्व नाही?’
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य, विज्ञान) हे नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ यांच्या अखत्यारीत असून संस्थाचालक म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव बोर्डवर नमूद असल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष इमारत, वर्गखोल्या किंवा विद्यार्थी नसल्याचा आरोप होत आहे.
यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की,प्रत्यक्ष अस्तित्व नसताना कॉलेजला मान्यता कशी मिळाली?
हॉलतिकीटावर नमूद असलेले केंद्र बदलण्याचा निर्णय कोणी घेतला?
शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राची पाहणी का केली नाही?
अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या शाळेत परीक्षा कशी घेण्यात आली?
शिक्षण विभागाची भूमिका काय?
परळी तालुक्यातील एकही परीक्षा केंद्र ‘संवेदनशील’ नसल्याची माहिती स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे समजते. नियमांनुसार, ज्या केंद्राला परवानगी आहे त्याच ठिकाणी परीक्षा घेणे बंधनकारक आहे. केंद्र बदलण्यास कोणालाही स्वतंत्र परवानगी नसते. तरीही हा बदल कसा झाला, याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष
या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परीक्षा प्रक्रियेत गोंधळ, नियमभंग आणि संभाव्य गैरव्यवहार यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होईल का, आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…