पुणे: महाराष्ट्राचा प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ११ लाख रुपयांची प्रमुख कुस्ती रंगली होती. या लढतीत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे आमनेसामने आले होते. मात्र, सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दीड तास रंगली तगडी झुंज
१७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही मल्लांमध्ये जवळपास दीड तास चुरशीची झुंज पाहायला मिळाली. कुस्ती सुटत नसल्याने दोघेही दमलेले दिसत होते. दरम्यान, सामन्यात माऊली कोकाटे यांनी सिकंदरला कानठाळी दिल्याचा प्रकार घडला. त्यावर सिकंदरने त्यांना ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा कानठाळी दिल्याने दोघांमध्ये वादावादी सुरू झाली.
समर्थकाचा आखाड्यात प्रवेश; सामना थांबवला
वाद वाढत असतानाच कोकाटे यांचा एक समर्थक थेट आखाड्यात उतरला आणि सिकंदरवर हात उचलल्याचा प्रकार घडला. यामुळे वातावरण तापले. पंचांनी तात्काळ हस्तक्षेप करत सामना काही काळ थांबवला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला; मात्र अखेर निकाल न लागल्याने दोन्ही मल्लांना विजयी घोषित करण्यात आले.
“आमची बॉडी गरम होती” – सिकंदर शेख
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिकंदर शेख यांनी सौम्य भूमिका घेतली. “आमच्यात जे झालं ते रागारागात झालं. आम्ही कुस्तीत होतो, आमची बॉडी गरम होती. मला कुणालाही बदनाम करायचं नाही. कोकाटेसोबत एक मुलगा होता, तो माझ्यावर धावून आला. बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीचं आहे; पण हा फार मोठा विषय नाही,” असे सिकंदर यांनी स्पष्ट केले.
मल्ल म्हणून सन्मान कायम
शांत स्वभाव आणि उत्कृष्ट तंत्रासाठी ओळखले जाणारे सिकंदर शेख यांनी यावेळीही माऊली कोकाटे यांचा मल्ल म्हणून सन्मान राखल्याचे दिसून आले. मात्र, बाहेरून समर्थकांनी आखाड्यात घुसून हस्तक्षेप करणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा कुस्तीप्रेमींमध्ये रंगली आहे.महाशिवरात्रीच्या निमित्ताने रंगलेल्या या ११ लाखांच्या कुस्तीपेक्षा सामन्यातील वाद अधिक चर्चेत राहिल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…