३,९६१ कोटींचा पुनर्विकास प्रकल्प; पार्लेकरांसाठी भावनिक निरोप
मुंबई: अगदी शहरांपासून गावातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचलेलं, पिढ्यान्पिढ्या चहाच्या कपासोबत नातं जपणारं पार्ले-जी बिस्कीट…या बिस्किटांचा जन्म ज्या विलेपार्ल्यात झाला, ती ऐतिहासिक जागा आता इतिहासजमा होणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील पार्ले-जी बिस्किट फॅक्टरीच्या जागेवर भव्य व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असून, लवकरच या इमारतीचं पाडकाम सुरू होणार आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ही फॅक्टरी केवळ उत्पादन केंद्र नव्हती, तर विलेपार्लेकरांच्या ओळखीचा आणि आठवणींचा अविभाज्य भाग होती. विलेपार्ले स्टेशनवर उतरल्यावर वाऱ्यासोबत दरवळणारा बिस्किटांचा गोड सुगंध आणि “पार्ले बिस्किट फॅक्टरी” हा परिसराचा लॅण्डमार्क म्हणून ओळखला जात होता.
१३.५४ एकरवरील ऐतिहासिक आवाराचा कायापालट
विलेपार्ले येथील १३.५४ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या पार्ले-जी फॅक्टरीच्या जागेला राज्य पर्यावरण प्राधिकरणाने व्यावसायिक पुनर्विकासासाठी मंजुरी दिली आहे.या प्रकल्पासाठी तब्बल ३,९६१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, या ठिकाणी अनेक व्यावसायिक इमारती, अत्याधुनिक कार्यालयीन संकुले, हायटेक पार्किंग टॉवर्स आणि आधुनिक नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत.विलेपार्ले हा परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्यामुळे प्रस्तावित इमारतींची उंची २८ ते ३१ मीटर इतकी मर्यादित ठेवण्यात येणार आहे.
निसर्गावरही परिणाम; १,८५१ नवीन झाडे लावण्याचं आश्वासन
पुनर्विकास प्रक्रियेत केवळ इमारतींचाच नाही, तर परिसरातील निसर्गाचाही मोठा बदल होणार आहे.या आवारात सध्या ५०८ मोठी झाडे आहेत. यापैकी १२९ झाडे तोडण्यात येणार, तर ६८ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी विकासकाने १,८५१ नवीन झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये १,२०० झाडांची मियावाकी जंगल योजना राबवली जाणार असून, त्यामुळे भविष्यात हरित क्षेत्र वाढवण्याचा दावा करण्यात आला आहे.
महापालिकेकडून मंजुरी; पाडकाम लवकरच
मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्पाला Commencement Certificate (काम सुरू करण्याची परवानगी) मिळाल्यामुळे आता लवकरच फॅक्टरीच्या पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.एकूण १.९० लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर होणाऱ्या या नव्या बांधकामामुळे विलेपार्लेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.
पार्लेकरांसाठी भावनिक क्षण
स्थानिक रहिवाशांसाठी ही फॅक्टरी केवळ एक इमारत नव्हती, तर त्यांच्या बालपणाच्या, कामगारांच्या आठवणींचा आणि परिसराच्या ओळखीचा भाग होती.शाळेत जाण्याआधी दूध-पार्ले-जी, आजारपणातला पहिला घास, प्रवासातील सोबती अशा असंख्य आठवणी या फॅक्टरीशी जोडलेल्या आहेत.इमारत जरी जमीनदोस्त होत असली, तरी पार्ले-जीने भारतीयांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या आठवणी मात्र कायम राहणार आहेत.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…