मुंबई : ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचा वेग कायम आहे. गेल्या तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा दर क्विंटलला ५,७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. किरकोळ बाजारात साखरेचा दर ५९ ते ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र, बाजारातील मागणीच्या तुलनेत हा कोटा कमी असल्याने दरवाढीला आळा बसत नसल्याचे चित्र आहे. वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी दोन लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा खुला करण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे.
मात्र, केंद्र सरकारकडून या मागणीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने साखरेच्या दरात सातत्याने तेजी दिसत आहे. त्यातच सट्टेबाजांची सक्रियता वाढल्याने बाजारातील तेजीला आणखी बळ मिळाल्याचे जाणकार व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साखरेच्या निविदांचे दरही क्विंटलला ५,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अडीच महिन्यांनंतर नवीन गाळप हंगाम
ऑगस्टचे उर्वरित दिवस आणि त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर हे दोन महिने पाहता, सुमारे अडीच महिन्यांनंतर २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारातील साखरेचा पुरवठा आणि उपलब्ध साठा हा दरवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून वाढू शकतो पुरवठा
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे इतर राज्यांच्या तुलनेत साखरेचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील कारखान्यांना प्रत्येकी एक लाख टनाचा अतिरिक्त कोटा तत्काळ खुला केल्यास बाजारात साखरेचा पुरवठा वाढू शकतो. यामुळे वाढत्या दराला काही प्रमाणात आळा बसून बाजारभाव स्थिर होण्याची शक्यता आहे.
आता केंद्र सरकार साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कोट्याबाबत काय निर्णय घेते, याकडे साखर उद्योगासह व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक…
मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी…
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.…
काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे…
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे…
मुंबई: पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने उभारण्यासाठी बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्याची…