मुंबई: मुंबई हे स्वप्नांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नगरीत लोक नशीब अजमावण्यासाठी येतात. खूप कमी लोकांना यात यश येते पण बरेच लोक स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे मिळेल ते काम करुन रोजी रोटी कमवतात. पण 1960 चे दशक मुंबईच्या फुटपाथवर झोपणाऱ्या गरीब, मजुरांसाठी काळ ठरला.
रमण राघव हा दक्षिण भारतातून मुंबईत आलेला व्यक्ती गरिबांसाठी यम ठरला. तो रस्त्यावर, फुटपाथवर आणि झोपडपट्टीत झोपलेल्या व्यक्तींवर हातोड्याने वार करुन त्यांना ठार मारत असे. यामध्ये वयस्कर, तरुण, लहान मुले आणि महिलांचा समावेश होता. महिलांची हत्या करून तो त्यांच्या मृत शरीरावर बलात्कार करत असे.
1960 मध्ये मालाडच्या झोपडपट्टीत एका झोपडीबाहेर झोपलेल्या मजुराला अज्ञात व्यक्तीने डोक्यात अवजड वस्तू मारून त्याची हत्या केली होती. त्या मजुराच्या हातातील घड्याळ, त्याच्या खिशातील काही पैसे त्या अज्ञात व्यक्तीने काढून घेतले. काही दिवसांनी त्याच परिसरातील दुसऱ्या एका झोपडपट्टीत असाच एक प्रकार घडला. यामध्ये एका झोपडीत झोपलेल्या स्त्री, पुरुष आणि दोन लहान मुले अशा संपूर्ण कुटुंबाची त्याने हत्या केली. हातोड्याच्या वाराने जागीच मरण पावलेल्या त्या महिलेच्या मृत शरीराशी त्याने संबध बनवण्याचा प्रयत्न केला. पण झोपडीच्या दिशेने काही लोक येत असल्याचे संशय आल्याने त्याने तिथून पळ काढला. जाताना त्याने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली.
अशा 2 ते 3 घटनांनंतर शहरभर त्या अज्ञात व्यक्तीची दहशत पसरली होती. संध्याकाळ झाली की लोक आपापल्या घरात बंदिस्त होऊ लागले. शहरात सुमारे 2000 पोलीस रात्रीची गस्त घालू लागले. पण या व्यक्तीला पकडण्यात त्यांना यश येत नव्हते. या व्यक्तिच्या कचाट्यातून सुटलेल्या एका महिलेने त्याचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरुन त्याचे चित्र काढून ते शहरभर वितरित करण्यात आले. हा व्यक्ती नेहमी त्याच्याजवळ छत्री, टॉर्च, आणि अवजड वस्तू ठेवतो, अशी माहिती आणखीन काही पीडित लोकांनी पोलिसांना दिली.
पोलीस त्याचा शोध घेत होते. काही दिवसांनी त्या अज्ञात खुन्याच्या वर्णनाशी मिळताजुळता व्यक्ती एका बस मध्ये चढला. त्या बसमध्ये एक हवालदार देखील प्रवास करत होता. त्याच्या हातातील वस्तू आणि त्याचे वर्णन पाहून पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्यावर संशय आला. त्याने त्याला ताब्यात घेतले. आणि त्याला पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या व्यक्तीचे नाव रमण राघव होते. तो दक्षिण भारतातून नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. पहिल्या दोन तीन हत्या केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी त्याच परिसरातील चहाच्या टपरीवर किंवा न्हाव्याच्या दुकानावर जात असे. तिथे जमलेले लोक वस्तीत आदल्या रात्री घडलेल्या हत्याकांडाची चर्चा करत असत. कोणी त्याला मायावी म्हणत, असत तर कुणी त्याला राक्षस, भूत म्हणत असत.
स्वतःची दहशत बघून त्याला आनंद वाटायचा आणि तो आणखीन जास्त खून करण्यास प्रवृत्त व्हायचा. सुरुवातीला रमणने ज्या एका मृत महिलेच्या गळ्यातील चेन काढून घेतली होती. ती चेन सोन्याची नसून बनावट होती, त्यामुळे चिडलेल्या रमणने महिलांना मोठ्या प्रमाणात लक्ष केले. त्यांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करत असे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
तीन वर्षात त्याने 40 पेक्षा अधिक हत्या केल्या होत्या. या हत्येमागचे कारण विचारले असता तो पोलिसांना म्हणाला की,” मी ज्यांना मारले ते सगळे चुकीचे लोक होते. देवाने मला सर्वांना मारायला सांगितले. हे सर्व देवाच्या नियमाच्या विरुद्ध वागत होते. स्त्री स्त्रीसोबत, पुरुष पुरुषासोबत झोपत होते. मला त्या सर्वांना मारावे लागले. सर्व काही चुकीचे चालले आहे. माझ्याकडे याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मी साधा सरळ गरीब माणूस आहे, पण माझ्या आत दुसरा माणूस आहे, जो दुर्बल नाही. तोच सगळ्यांना मारायचा मी चूक केली नाही.”
रमणच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पण नंतर त्याच्या आरोग्य तपासणीत तो मनोरुग्ण असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्याची फाशीची शिक्षा बदलून जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली, तेथेही त्यांच्यावर अनेक वर्षे उपचार सुरु होते. त्याच वेळी, 1995 मध्ये सायको किलर रमण राघवचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे ससून रुग्णालयात मृत्यू झाला.