मुंबई: ‘दशावतार’सारख्या चित्रपटानंतर कोकणातील कला, परंपरा, धार्मिक प्रथा आणि तिथल्या गूढ वातावरणावर आधारित कथा वेबमालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने समोर येत आहेत. मात्र या प्रवाहात अनेकदा कोकणी संस्कृतीबाबत गैरसमज पसरवले जातात किंवा आशयात तोचतोचपणा दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबमालिका वेगळी ठरते.
कोकणातील गुहागरजवळील देवतळी या काल्पनिक गावात घडणाऱ्या या कथेचा केंद्रबिंदू आहे शंकासुर आणि त्याच्याशी जोडलेली भीती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. शिमग्याच्या सणादरम्यान दरवर्षी गावात होणाऱ्या खुनांच्या घटनांना शंकासुराची शिक्षा मानली जाते. पंधरा वर्षांपासून सुरू असलेलं हे हत्यासत्र गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा भाग बनलेलं असतं.
याच गावात नव्याने नियुक्त झालेला पोलीस अधिकारी विश्वास सरंजामे (अंकुश चौधरी) या प्रकरणाचा तपास हाती घेतो. शिमग्याच्या काळात देवतळीमध्ये पोलीस बंदोबस्त नको, हा गावकऱ्यांचा हट्ट आणि त्यानंतरही घडणारी हत्या या सगळ्यामुळे रहस्य अधिक गडद होत जातं. शंकासुर खरंच शिक्षा देतो की या सगळ्यामागे मानवी पाप, स्वार्थ आणि कटकारस्थान दडलेलं आहे, याचा शोध म्हणजे ‘देवखेळ’.
दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांनी ही कथा अत्यंत संयमित आणि प्रभावीपणे मांडली आहे. कोकणाचं सौंदर्य, गावातील वातावरण, परंपरा आणि उत्सव यांचं वास्तवदर्शी चित्रण मालिकेला वेगळं परिमाण देतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा नेमकी कुठे आहे, हा प्रश्न मालिका ठळकपणे उपस्थित करते.
अभिनयाच्या बाबतीत अंकुश चौधरी यांनी साकारलेला विश्वास सरंजामे विशेष लक्ष वेधतो. नायकत्वाचा दिखावा न करता शांत, तत्त्वनिष्ठ आणि ठाम भूमिका त्यांनी प्रभावीपणे उभी केली आहे. प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, मंगेश देसाई, वीणा जामकर यांच्यासह काही नव्या कलाकारांनीही मालिकेत ताजेपणा आणला आहे. पार्श्वसंगीत आणि गूढ वातावरण निर्मितीही कथेला पूरक ठरते.
शेवटाकडे कथा थोडी गोंधळते, काही प्रश्न अनुत्तरित राहतात, तरीही अंधश्रद्धेवर थेट आणि रंजक भाष्य करणारी ‘देवखेळ’ ही वेबमालिका एक वेगळा अनुभव देणारी ठरते. कोकणाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या रहस्यमय कथांमध्ये रस असणाऱ्यांसाठी ही मालिका पाहण्यासारखी आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…