सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंग मोहिते पाटील यांना ‘मास्टरमाईंड’ ठरवले आहे. या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’चा प्रयत्न; सातपुते यांचा दावा
राम सातपुते यांनी दावा केला की, “माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला. या कटामागे अर्जुनसिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टरमाईंड आहेत.”
या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवले असून, भविष्यात आपल्या जीवाला काही धोका झाल्यास जबाबदारी कोणाची असेल याची स्पष्ट नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.
सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना, “संवैधानिक पद्धतीने लढण्याची ताकद संपल्याने असे प्रकार केले जात आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला निवडणुकीत हरवू शकत नाही, तेव्हा अशा मार्गांचा अवलंब करणे चुकीचे आहे,” असे वक्तव्य केले.
पोलिसांचा माळशिरस तालुक्यात तळ
या आरोपांनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून माळशिरस तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी तळ ठोकला आहे. काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. पोलिसांना या कटाबाबत आधीच माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.या सर्व घडामोडींमुळे माळशिरससह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांचाही आरोप
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनीही काल अशाच स्वरूपाचा आरोप केला होता. माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. “राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता,” असा दावा त्यांनी केला.मोहिते पाटील यांनी गोरेंना ‘गुंड’ म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर गोरे यांनी प्रत्युत्तर देताना “मोहिते हेच सर्वात मोठे गुंड आहेत,” असा पलटवार केला.
पुढे काय?
गंभीर आरोप-प्रत्यारोपांमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी आणि राजकीय नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आरोपांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…