leopard-sharp-shooter
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील जांबुत व पिंपरखेड परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. गेल्या पंधरवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी शार्पशुटर टीम पिंपरखेड येथे दाखल झाली असून, डॉ. चंद्रकांत मंडलिक, झुबीन तैहमुर पोस्टवाला आणि विनोद सोनावळे या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील पथकाने ट्रॅप कॅमेरे, ड्रोन, शस्त्रास्त्रे व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानासह मोर्चा उघडला आहे. शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, “पिंपरखेड येथे ८ व जांबुत येथे १४ पिंजरे बसविण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास अजून पिंजरे वाढवले जातील.”
मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार, बिबट्या दिसताच गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, पकडलेल्या बिबट्यांना जवळच्या जंगलात सोडले जात असल्याने ते पुन्हा गावात परतत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. माणिकडोह बिबट निवारण केंद्रात जागा संपल्यामुळे पकडलेल्या बिबट्यांचे पुनर्वसन अडचणीत आले आहे. बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. परिणामी, जि.प. पिंपरखेड, कोयमहालेवस्ती, ढोमेमळा, दाभाडेमळा, गाजरेझाप, चांडोह (दुपारनंतर), माध्यमिक विद्यालय पिंपरखेड, जांबुत, चांडोह व वडनेर खुर्द अशा नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत.
शिक्षण विस्तार अधिकारी के. बी. खोडदे यांनी सांगितले की, ‘बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी विद्यार्थी शाळेत न पाठवल्यामुळे शिक्षक हजर असूनही शाळा बंद राहिल्या.” दरम्यान, परिसरात घडणाऱ्या वारंवार हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांचा राग अखेर भडकला. मौजे पिंपरखेड येथे बिबट शीघ्र कृती दलाच्या बोलेरो वाहनाची (MH 14 KQ 3752) तोडफोड करून ती जाळण्यात आली. त्यानंतर दलाच्या इमारतीवर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. बेस कॅम्पमधील संरक्षण कुटीचे दरवाजे-खिडक्या, टेबल, खुर्च्या, पाण्याचे टँक, टॉर्च, सोलर लाईट्स यासह सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. माहिती फलकही फोडण्यात आला. या घटनेची माहिती वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे कार्यालयाने दिली आहे.
वीस दिवसांत तीन आणि शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांतील बारा बिबट हल्ल्यांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वनविभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी जनतेतील भीती आणि संताप शमण्याचे नाव घेत नाही. गावांमधील लोकांचा आक्रोश, शाळा बंद, तसेच मालमत्तेचे नुकसान पाहता, आता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे अपरिहार्य आहे,अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. बिबट्यांच्या वाढत्या हालचाली, ताणलेली सुरक्षा परिस्थिती आणि ग्रामस्थांचा असलेला रोष लक्षात घेता, मानव-वन्यजीव संघर्ष आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. यावर कठोर, योजनाबद्ध आणि शाश्वत उपाययोजना करण्याची गरज सर्व स्तरावरून व्यक्त होत आहे.
शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…
शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…
शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…