नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण ही महायुती सरकारची त्रिसूत्री असल्याचे सांगत ‘शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे’ हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी एका दिवसात २० हजारांहून अधिक नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे शिंदे यांनी सांगितले.
युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्टार्टअप, इनोव्हेशन आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत “आकाशाला गवसणी घाला; पण पाय जमिनीवर ठेवा,” असा संदेश त्यांनी दिला.
२०२२ नंतर जनतेने शिवसेनेच्या कामावर विश्वास दाखविल्याचा उल्लेख करत, “आमचा अजेंडा सत्ता नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास आहे,” असे शिंदे म्हणाले. शिवसेना ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून वर्षभर जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेली संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. दापोली येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा करत संबंधित शासन निर्णय (जीआर) त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचेही शिंदे यांनी कौतुक केले. २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, २० हजार नागरिकांना विविध शासकीय लाभांचे वितरण आणि राज्यभर ‘शिवसेना जनतेच्या दारी’ अभियान राबविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ४५० कोटी रुपयांच्या स्वच्छता यंत्रसामग्री उपक्रमाची माहितीही देण्यात आली.या कार्यक्रमाला रामदास कदम, गजानन कीर्तिकर, सिद्धेश कदम, शीतल म्हात्रे, सचिन अहिर, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, प्रकाश सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.