दगड की माती? लोकशाही सन्मानाने विकसित रहावी
मुंबई शितल करदेकर): लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. कारण याच प्रक्रियेतून नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येतो आणि आपल्यासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडता येतात. मात्र हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, हे भान अनेकदा विसरताना दिसते. तांचा जोगवा मागताना साधेपणा, नम्रता दाखवणारे अनेक जण निवडून आल्यानंतर मात्र बादशाही थाटात वावरू लागतात. ज्यांच्या मतांवर ते निवडून आले, त्या मतदारांना ठरावीक दिवशी भेटायलाही टाळाटाळ होते. समाजकारण बाजूला पडते आणि राजकारण, पक्षीय स्वार्थ, कार्यकर्त्यांचे समाधान व सणासुदीला दिखाऊ मदत यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित राहते.
लोकप्रतिनिधी म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अनेक जण विसरतात. राजकारण जर जनहिताचे माध्यम राहिले नाही, तर जनता योग्य वेळी जागा दाखवतेच. निवडणूक जिंकण्यासाठी सुरू असलेल्या कसरती आपण पूर्वी चित्रपटांत पाहत होतो. मात्र अलीकडच्या काळात थेट पक्ष फोडणे, आमदार-नगरसेवक पळवणे, माणसं फोडणे असे प्रकार उघडपणे घडताना दिसत आहेत. जिंकण्यासाठी काहीही अशी मानसिकता राजकारणात उतरली आहे.
मतदार यादी अचूक असेल, मतदानाची यंत्रणा पारदर्शक व विश्वासार्ह असेल, तर निवडणूक प्रक्रिया उत्तम होऊ शकते. मात्र याठिकाणीही अनेक घोळ होत असल्याचे चित्र दिसते. याच पार्श्वभूमीवर अलीकडे चर्चेत आलेला विषय म्हणजे पुसली जाणारी मतदानाची शाई. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “उद्यापासून पाडू, ईव्हीएम, पुसणारी शाई यावर चर्चा सुरू होईल,” असे विधान केले. प्रश्न असा आहे की, निवडणूक स्वच्छ, विश्वासार्ह आणि पारदर्शक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची अपेक्षा सरकारकडून व आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाकडून नसेल, तर ती कोणाकडून असावी. या निवडणुकीत मतदान यंत्रणेबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या. त्यातच पुसली जाणारी शाई हा गंभीर मुद्दा समोर आला. निवडणुकीची जबाबदारी असणारे वाघमारे म्हणतात, “शाई पुसून कोणी दुबार मतदान केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.” तर मुख्यमंत्री म्हणतात, “ऑईल पेंट लावायला हवे.”
खरंच, ‘मतदार राजा’ची ही चेष्टा नाही का? थेट फुसकट शाईपर्यंत विषय जाण्याचे कारण काय? हा विषय अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये शाई घोटाळा झाला आहे, असा आरोप करत प्रख्यात व्यंगचित्रकार प्रशांत आष्टिकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने कोरस इंडिया कंपनीचे अवघ्या १० रुपयांचे मार्कर वापरून दुबार मतदानाला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी जर्मनीत तयार होणारी ‘परमनंट वॉटरप्रूफ रोटरी इंक’ वापरली जात होती. (२३ मि.ली.ची किंमत सुमारे ५०० ते ५५० रुपये.) मग यावेळी अवघ्या ५–१० रुपयांचे, सहज पुसता येणारे मार्कर पेन का वापरण्यात आले.
याबाबत आष्टिकर म्हणतात, “हे दुबार मतदानास सहकार्य करण्यासाठी नियोजनबद्ध कट आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.” या तक्रारीत राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि या लोकशाहीच्या उत्सवात जनतेची फसवणूक करणाऱ्या रॅकेटवर कठोर कारवाईची तसेच निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढील काळात राज्यभर जिल्हानिहाय तक्रारी दाखल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खरंच, पैसे लोकांचे, मते लोकांची मग या निवडणुकीत ‘लो-बजेट’ शाई का? हा प्रश्न विचारणे गुन्हा नाही. यात कोणतेही वैयक्तिक वैर नाही. निवडून येणारे सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते जनतेसाठी विश्वस्त असते. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील प्रत्येक बाब पारदर्शक, विश्वासार्ह आणि संशयमुक्त असणे ही प्रामाणिक नागरिकांची अपेक्षा व जबाबदारी आहे. किमान आपले प्रतिनिधी जबाबदारी पूर्ण करणारे, प्रामाणिक असावेत लबाड नसावेत.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…