मुंबई: विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा तसेच स्वतःची आवड आणि क्षमता ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे होणारे फायदे तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली.
विद्यार्थीदशा हा व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजासाठी काम करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे पाटील यांनी सांगितले.
मुलींना दरमहा दोन हजार रुपये पॉकेट मनी देण्याचा विचार
मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी विद्यापीठ, महाविद्यालये आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुलींना दरमहा दोन हजार रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याबाबत उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी केवळ इतिहासाचा अभ्यास न करता ऐतिहासिक वारसा, वास्तू आणि सांस्कृतिक ठेव्याच्या संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारावी. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी इंटर्नशिपच्या संधी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संवादाची गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडावेत, तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांशी नियमित संवाद ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना केले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच रुईया महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील वाटचालीबाबत जाणून घेत मंत्री पाटील यांनी सुमारे दोन तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला.