विमुक्त समाजाला सहानुभूती नको, घटनात्मक हक्क आणि सन्मान हवा!

महाराष्ट्र

५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून देशव्यापी चळवळ उभारणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुंबई: विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. या समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन मिळवून देण्यासाठी तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माटुंगा येथे विमुक्त दिनानिमित्त आयोजित ‘शिवसेना भटके विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद २०२६’ मध्ये ते बोलत होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वसंतराव नाईक यांना अभिवादन करून शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली.

बंजारा, मदारी, भोई, वैदू, वासुदेव, बहुरूपी, पारधी, गोंधळी, वडार, वंजारी, गोसावी, लमाण, धनगर, मसनजोगी, नाथपंथी यांच्यासह ५२ समाजांचे प्रतिनिधी या परिषदेत एकत्र आले होते.

“काल परभणीत एका संजयने गर्दी दाखवली, आज मुंबईत या संजयने शक्ती दाखवली,” असे म्हणत शिंदे यांनी मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. शिवसेना डीएनटी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राठोड यांच्यावर ५२ समाजांना एकत्र आणण्याची जबाबदारी असून त्यांनी तांड्यातील माणसाला मंत्रालयाशी जोडल्याचे शिंदे म्हणाले.

ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राइब्स ॲक्टच्या माध्यमातून या कष्टकरी समाजावर जन्मजात गुन्हेगार असल्याचा कलंक लावला होता. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी या कलंकातून विमुक्तता झाली. त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि संघर्षाचा ऐतिहासिक दिवस असल्याचे शिंदे यांनी सांगितले.“आपल्याला कुणाची मेहरबानी नको; माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि हक्क पाहिजे,” असे शिंदे म्हणाले.

आजही शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य, जात प्रमाणपत्र तसेच आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड मिळवताना समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विमुक्त समाजाची ओळख केवळ संघर्षाची नव्हे, तर शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासाची झाली पाहिजे. समाजातील मुले डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि उद्योजक झाली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत कोचिंग, शिष्यवृत्ती, आरोग्य विमा, रोजगारासाठी आर्थिक मदत, कौशल्य विकास, स्टार्टअप आणि उद्योगांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या योजनांना आणखी बळ देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

भटक्या-विमुक्त समाजाच्या लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचे जतन करण्यासाठी राज्यस्तरीय मोठे संमेलन आयोजित करून कलाकारांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन दिले जाईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत या समाजाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरव केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन करत ५२ समाजांनी एकजूट कायम ठेवावी, असे शिंदे म्हणाले. “पाच बोटे वेगवेगळ्या दिशेला असतात; मूठ आवळली की ताकद निर्माण होते,” असे त्यांनी नमूद केले.

केवळ शक्तिप्रदर्शन नव्हे, तर समाजाच्या परिस्थितीत प्रत्यक्ष बदल घडवणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, असे सांगत शिंदे यांनी तरुणांना “चेंज मेकर बना,” असे आवाहन केले. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगतानाच शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो,” असे सांगत ५२ भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्क, सन्मान आणि विकासाच्या लढ्यात आपण खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय शिरसाट, राज्यसभा खासदार प्रा. ज्योती वाघमारे, लेखक लक्ष्मण गायकवाड, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह आमदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत