अजितदादांसोबत आले तेच खरे कुटुंब; आनंद परांजपे यांची ठाम भूमिका

महाराष्ट्र

ठाणे: “कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नसतात. २ जुलै २०२३ रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर जे सर्व अजितदादांसोबत आले, तेच त्यांचे खरे कुटुंब होते,” अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मांडली. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर किती वेदना होत असतील, याचा क्षणभर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी २७ जानेवारीच्या घटनाक्रमाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध नोंदवला. काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपांमागील मार्गदर्शक शक्तीचाही पक्षाच्या वतीने त्यांनी निषेध केला. “ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशा शब्दांत त्यांनी खडेबोल सुनावले.

अजितदादांच्या दु:खद निधनानंतर अंत्यविधीपूर्वीच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या, हे दुर्दैवी असल्याचे सांगत परांजपे म्हणाले की, अशा संवेदनशील वेळी राजकीय वक्तव्ये टाळली गेली पाहिजेत. पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केली असून, झालेल्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, ही मागणी पहिल्या दिवसापासून आहे. “टाईम बॉम्बसह सर्व अंगांनी चौकशी झाली पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. “२७ जानेवारीच्या घटनाक्रमाबाबत राजकीय भूमिका आम्ही मान्य करणार नाही. मात्र २८ जानेवारीसंदर्भात उपस्थित झालेले प्रश्न तपासातून स्पष्ट झाले पाहिजेत. ऐनवेळी कॅप्टन बदलला का? घात होता की अपघात? याची चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

अजितदादांच्या जाण्यानंतर सुनेत्राताई पवार यांच्याकडून पक्षाला आधार मिळत असल्याचे सांगत परांजपे म्हणाले की, त्यांच्या विधीमंडळ पदी निवडीनंतर त्या सर्व आमदारांची भेट घेणार असून वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

विमान अपघाताबाबत रात्री ८.४४ वाजेपर्यंत काय घडले, RO पायलटचा मुद्दा काय होता, तसेच इंजिन मेंटेनन्स आणि विमान उड्डाणासाठी सक्षम होते का, या सर्व बाबी तपासातून समोर यायला हव्यात, असे ते म्हणाले. “अजितदादांना आपण गमावले आहे; सत्य जाणून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर निष्कर्ष निघेल. या प्रकरणावर राजकारण करू नये,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.