मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेल्या माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. निवड जाहीर होताच त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देताना “निष्ठेचं फळ” असे म्हटले.
निवड होताच पहिली प्रतिक्रिया
“निष्ठा आणि त्याचं फळ हे मातोश्रीने दाखवून दिलेलं आहे. सभागृहात शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्यास मी कटिबद्ध राहीन. मातोश्रीच्या मोठ्या मनाबद्दल मला बरंच काही बोलायचं आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांनी व्यक्त केली.
‘मातोश्री’वर शिक्कामोर्तब
२१ तारखेला सकाळी ११ वाजता मुंबई महानगरपालिकेत पक्षामार्फत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची औपचारिक घोषणा विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर साईनाथ दुर्गे, माधुरी विश्वासराव-मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल. या तिन्ही नावांवर ‘मातोश्री’वर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
दोन महिन्यांपूर्वी नाराजी
तिकीट नाकारल्यानंतर माधुरी मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिली होती. “मी ३५ वर्षे संघटनेसाठी काम केलं. २०१७ मध्येही तिकीट वाटपात माझा बळी गेला होता, आत्ताही तसंच झालं. माझं कुठे चुकलं हे मला सांगावं. शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं,” अशा शब्दांत त्या ढसाढसा रडल्या होत्या. मात्र अवघ्या दीड-दोन महिन्यांतच चित्र पालटलं आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
बृहन्मुंबई महानगरपालिकेत संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची एकूण संख्या १० आहे. त्यापैकी भाजपच्या वाट्याला ४, शिंदेंच्या शिवसेनेला २, काँग्रेसला १ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ३ जागा मिळणार आहेत. भाजप, काँग्रेस आणि शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत नावे जाहीर झालेली नाहीत.
ठाकरी बाणा दाखवणार?
सलग ३४ वर्षे पक्षासाठी काम केलेल्या माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांना ही निवड म्हणजे निष्ठेचे फळ असल्याचे बोलले जात आहे. वक्तृत्व निपुण असलेल्या माधुरी मांजरेकर महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांविरुद्ध आपला ठाकरी आक्रमक बाणा कसा दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली.
“कोण कोणाला भेटते यावर आमचे बंधन नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांच्या विरोधातील लढ्यात आमचाच जय होईल. त्यांच्या भेटीबाबत मला काही वाटत नाही आणि मी त्या विषयाकडे पाहत नाही,” असे राऊत म्हणाले.तसेच, “राज ठाकरेंना तुम्ही विचारा. आम्ही कुणाची हेरगिरी करत नाही. आमची भूमिका ठाम आहे,” असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.