पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राला (RMC) भेट देत पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हवामान तज्ज्ञांशी चर्चा करून राज्यातील पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत माहिती घेतली.

हवामान केंद्रातील तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी जय पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. नायर, सौ. निथा, डॉ. जिस्मी आणि योगेश यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पावसाच्या विलंबामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. एल निनोचा संभाव्य प्रभाव तसेच इतर हवामानविषयक घटकांवरही चर्चा झाली.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुमारे २५ जूनच्या आसपास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत असून, पावसाच्या विलंबामुळे शेती, जलसाठे आणि जनजीवनावर परिणाम होत आहे.

यावेळी जय पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन सातत्याने सुरू होईपर्यंत पेरणीची घाई करू नये. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

पाऊस नियमित सुरू होईपर्यंत प्रादेशिक हवामान केंद्राशी सातत्याने संपर्क ठेवून पावसाच्या प्रगतीविषयीची अचूक आणि अद्ययावत माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जय पवार यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत