ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय भेटणारा नेता” अशी प्रतिमा निर्माण झालेल्या शिंदे यांच्याकडे तळागाळातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री व माजी आमदार विनायकराव जाधव पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा, नांदेड, अकोला, लातूरसह विविध जिल्ह्यांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. “बुलढाणा ते नांदेड, अकोला ते लातूर” असा विस्तार साधत पक्षाची ताकद राज्यभर वाढत असल्याचे यावरून दिसून येते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे; इथे कोणी मोठा-छोटा नाही.” त्यांनी सर्वसामान्यांशी थेट संपर्कावर भर देत “मला भेटायला कोणालाही अपॉइंटमेंट लागत नाही,” असेही सांगितले. बालासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर शिवसेना पुढे चालत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रवेश सोहळ्यात संतोष सोमवंशी, नवनाथ भोसले, संग्राम पाटील हायगले यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला. तसेच शेतकरी नेते शंकरराव धोंडगे आणि माजी खासदार सुरेश जाधव यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान, लवकरच २५ हजार कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून दररोज होत असलेल्या प्रवेशांमुळे शिवसेनेचा विस्तार वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत शिंदे यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, एसटीमध्ये ५०% सवलत, मुलींचे मोफत उच्च शिक्षण आणि पिक विमा यांचा उल्लेख केला. “सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे हाच आमचा उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विविध निवडणुकांमध्ये शिवसेना “नंबर २” वर पोहोचल्याचा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे लक्ष्य ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळत असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा विस्तार अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.