दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. दोन तृतीयांश फुटीसाठी आवश्यक असलेला सहा खासदारांचा आकडा पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूमिका बदलल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवारी रात्री खासगी विमानाने पुणे-मुंबई मार्गे दिल्ली गाठली. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटातील काही खासदार नेतृत्व बदलण्याचा निर्णय जाहीर करू शकतात, अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित खासदार दिल्लीत दाखल झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकसभेत नऊ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश फुटीसाठी सहा खासदारांची आवश्यकता होती. ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे हे गणित पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
चर्चेत असलेल्या संभाव्य बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र, या संदर्भात संबंधित खासदारांकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.