पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान, विश्वासू आणि समर्पित सहकारी हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शोकसंदेशात सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे की, जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, कार्यनिष्ठा आणि जनसेवेची मूल्ये जपत पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, लोककल्याण आणि प्रभावी प्रशासनाला प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणात त्यांचे मोठे योगदान राहिले. पक्षाच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा, कार्यकर्त्यांशी असलेला आत्मीय संवाद आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने पक्षाने एक अनुभवी, निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी जालिंदर कामठे यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, “या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण कामठे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थना केली.