मुंबई: समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याचे सखोल संशोधन होणे गरजेचे असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी समाजोपयोगी व संशोधनाधिष्ठित साहित्यनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक अर्चना बोऱ्हाडे तसेच दोन्ही समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची महाराष्ट्रासह देशभरात मोठी मागणी असून उपलब्ध खंड संपल्यामुळे पुनर्मुद्रणाची गरज अधोरेखित करण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रकाशित सातही खंडांचे पुनर्मुद्रण करून नव्याने प्रकाशन करण्यास मान्यता देण्यात आली.
तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि इतर साहित्यावर आधारित स्वतंत्र स्वरूपातील दहा ग्रंथांचे प्रकाशन त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२६ रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राने गेल्या पाच वर्षांत अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण साहित्याचे ६५ ग्रंथ विविध भाषांमध्ये भाषांतरित केले आहेत. यामध्ये गुजरातीतील १५, हिंदीतील १५, इंग्रजीतील ३१, इंग्रजीतून रशियनमधील ३ आणि तमिळमधील २ ग्रंथांचा समावेश आहे. हे भाषांतरित साहित्य देश-विदेशातील वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे यासाठी संबंधित भाषांतील नामांकित प्रकाशकांमार्फत उच्च दर्जाच्या छपाईसह प्रकाशन करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
महात्मा जोतिराव फुले आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक साहित्याचा व्यापक प्रसार करून नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचविण्यासाठी पुनर्मुद्रण, नवीन साहित्यनिर्मिती, भाषांतरे आणि प्रकाशन या उपक्रमांना अधिक गती दिली जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.