छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा देशातील मोठ्या उद्योगांचे आकर्षण ठरत आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यूसह नामांकित कंपन्यांनी ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शवल्यानंतर आता आणखी पाच मोठ्या कंपन्यांनी औद्योगिक भूखंडांसाठी रस दाखविल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन स्टील आणि तीन ऑटोमोबाईल कंपन्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही आठवड्यांत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ऑरिक तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या क्षेत्रफळाच्या औद्योगिक भूखंडांची मागणी या कंपन्यांकडून करण्यात आली आहे. एका आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी जयपूर एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्याचीही माहिती आहे.
८ हजार एकर अतिरिक्त जमीन विकसित होणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश भूखंडांचे वाटप झाले आहे. त्यामुळे वाढती औद्योगिक मागणी लक्षात घेऊन ऑरिकसाठी अतिरिक्त सुमारे ८ हजार एकर जमीन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आरापूर येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचे काम सुरू असून वैजापूर एमआयडीसीच्या विकासालाही गती देण्यात येत आहे.
कोणत्या कंपनीला किती जमीन?
समोर आलेल्या माहितीनुसार, एका स्टील कंपनीने सुमारे ३०० एकर, तर एका ऑटोमोबाईल कंपनीने १०० एकर भूखंडाची मागणी केली आहे. अन्य एका ऑटो कंपनीला १५० एकर, तर तिसऱ्या ऑटो कंपनीला ७० एकर जागेची आवश्यकता आहे. संबंधित कंपन्यांना जयपूर, सटाणा आणि वैजापूर एमआयडीसीमधील उपलब्ध जागांची पाहणी करून देण्यात आल्याचे समजते.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एका कंपनीनेही जयपूर एमआयडीसी परिसरात जागेबाबत रस दाखविला आहे.
ऑटोमोबाईल हब म्हणून ओळख मजबूत
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या चार दशकांपासून ऑटोमोबाईल उद्योगाची मजबूत पायाभरणी झाली आहे. वाहन उद्योगासाठी आवश्यक सुटे भाग तयार करणाऱ्या अनेक कंपन्या या परिसरात कार्यरत आहेत. विकसित औद्योगिक इकोसिस्टम, कुशल मनुष्यबळ आणि वाहतूक सुविधांमुळे मोठ्या कंपन्यांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळण्याची शक्यता
टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स, जेएसडब्ल्यू, एथर एनर्जी आणि पिरॅमल फार्मास्युटिकल्स यांसारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर आता आणखी पाच कंपन्यांनी दाखविलेला रस छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रस्तावित गुंतवणुकी प्रत्यक्षात आल्यास उत्पादन क्षेत्रासह पूरक उद्योग आणि सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरची महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून असलेली ओळख आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.