जयंत पाटलांनी भर सभेत पक्षप्रवेशाच्या चर्चेवर दिलखुलास भाष्य; म्हणाले…

राजकीय

मुंबई: सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भर सभेत दिलखुलास भाष्य केले. निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य करत “निष्ठा फार महत्त्वाची आहे”, असे ठामपणे सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठींमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सातत्याने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी जाहीर सभेतच आपल्या शैलीत या चर्चांना उत्तर दिले.

“परिस्थितीनुसार बदलत गेलात, तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे. मला पद मिळेल किंवा नाही, त्यात काय? पण गट सोडायचा नसतो. नवीन माणसं येतात; पण आपली माणसं आपलीच असतात. ती आपल्या बरोबर असतात. राजकारणात यालाच महत्त्व दिले पाहिजे,” असे जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर सभेत एकच हशा पिकला.

‘निष्ठा बुडाल्यासारखी वाटते, पण…’

“राजकारण निष्ठेने आणि तत्त्वाने करण्याचा काळ मागील दहा वर्षांत संपला आहे, असे वाटते. पण आता असे कधीच होणार नाही, असे समजू नका. परिस्थिती बदलत असते. निष्ठा फार महत्त्वाची आहे. तिची रिव्हॅल्यू असते. निष्ठा बुडाल्यासारखी वाटते; पण पूर येऊन गेल्यानंतर लोक त्याच निष्ठेकडे पाहत असतात,” असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

“आपल्याला सगळ्यांसारखे व्हायचे असेल तर उद्या सकाळीच होऊ शकते. आमच्याकडे १० आमदार आणि ८ खासदार आहेत. काही सस्पेंड आहेत का नाही, हा वेगळा विषय,” असे म्हणत त्यांनी पक्षातील सध्याच्या ताकदीकडेही लक्ष वेधले.

‘कृष्णाकाठच्या लोकांची परंपराच संघर्षाची’

कृष्णाकाठच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, “कृष्णाकाठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आणि संघर्षाची आहे. संघर्ष करण्याचे या कृष्णाकाठच्या लोकांना शिकवले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अनेक नेत्यांची परंपरा या मातीत आहे. त्यामुळे कृष्णाकाठचा माणूस वेगळा आहे. आमच्या मनात काय आहे, हे सहजासहजी इतरांना कळत नाही.”

दरम्यान, जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निष्ठा आणि जीवनप्रवासावर आधारित ‘फिडेल’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिलीप पाटील यांनी “वाळव्याला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाळव्याचे नाव झाले पाहिजे,” अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर केलेल्या मिश्कील आणि सूचक भाष्यामुळे कार्यक्रमात राजकीय चर्चांना चांगलाच रंग चढला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत