मुंबई: मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत असून, नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. मात्र, मुंबईत पाणी कपात सुरू असताना या टँकरना पाणी नेमके कुठून मिळते, टँकर लॉबीचे मालक कोण आहेत आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
एखाद्या भागात विकास झालेला नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचलेली नसेल किंवा पाण्याचे स्वतंत्र स्रोत उपलब्ध नसतील, तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे समजू शकते. मात्र, पाणीटंचाई आणि कपात असतानाही टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असेल, तर त्यामागे नेमकी यंत्रणा काय आहे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे, असे लोंढे म्हणाले.‘या टँकर लॉबीचे मालक कोण आहेत? काही नगरसेवक किंवा त्यांच्या जवळचे कंत्राटदार अथवा नातेवाईक या व्यवसायात आहेत का?’ असे प्रश्न उपस्थित करत लोंढे यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती मुंबईकरांसमोर आणण्याची मागणी केली.
सरकारकडून चौकशी होत नसली तरी किमान हे टँकर कोणाचे आहेत, त्यांना पाणी कुठून मिळते आणि टँकर मालकांचे स्थानिक राजकीय व्यक्तींशी काही संबंध आहेत का, याचा खुलासा झाला पाहिजे. मुंबईकरांना या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे, असेही अतुल लोंढे यांनी म्हटले.मुंबई महानगरपालिका प्रशासन, महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारने मुंबईतील टँकर लॉबीबाबत सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.