महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला मिळणार नवी गती

महाराष्ट्र

बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर

मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याला नवी दिशा देण्यासाठी ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. या माध्यमातून संयुक्त प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सह्याद्री अतिथिगृह येथे ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन कंपन्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील जैवउत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन सहकार्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली.

मंत्री रावल म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक आणि आर्थिक शक्तिकेंद्र असून जैवतंत्रज्ञान, नवकल्पना, कृषी, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ऊर्जा क्षेत्रात जैवआधारित उपाययोजनांच्या माध्यमातून विकास अधिक शाश्वत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ऑस्ट्रेलियाकडे अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान, भांडवल आणि संशोधन क्षमता आहे, तर महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षमता आहे. या दोन्हींच्या एकत्रित ताकदीतून दोन्ही देशांसाठी फायदेशीर मूल्यसाखळी विकसित करता येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रिसिजन फर्मेंटेशनपासून हायड्रोजन निर्मितीपर्यंत संधी

प्रिसिजन फर्मेंटेशनवर आधारित जैविक रंग, पर्यायी प्रथिने, शैवालाधारित उत्पादने तसेच कृषी कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत मोठी क्षमता असल्याचे रावल यांनी नमूद केले. ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी महाराष्ट्रात प्रायोगिक प्रकल्प सुरू करून त्याचे उत्पादन आणि विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रस्तावित टास्क फोर्सच्या माध्यमातून संयुक्त प्रकल्पांची निवड, नियामक समन्वय आणि दोन्ही दिशेने होणाऱ्या गुंतवणुकीला गती देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कंपन्या व संशोधकांना ऑस्ट्रेलियातील बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

अन्न आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नियामक संस्था तसेच संशोधन संस्थांमध्ये अधिक दृढ सहकार्य निर्माण करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात केवळ ऑस्ट्रेलियन गुंतवणूक आणणे हा उद्देश नसून तंत्रज्ञान, व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीची द्विपक्षीय भागीदारी उभारणे हे मुख्य लक्ष्य असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले.

बैठकीस एफएसएसएआयच्या क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी, उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे उपमहावाणिज्यदूत ख्रिश्चन जॅक यांच्यासह ऑस्ट्रेलियन जैवउत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत