मुंबईतील २८ वर्षांचा अनुभव आता शिरूरच्या सेवेत; शिरूर पोलीस ठाण्याचा विनोद पाटील यांनी स्वीकारला पदभार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली; शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता पाटील यांच्याकडे

ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी शिरूर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच अनेक संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास करण्यात आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

केंजळे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई, वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या बदलीनंतर आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी यापूर्वी मुंबई येथे तब्बल २८ वर्षे विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गुन्हे तपासाचा व्यापक अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यातील कार्यक्षमतेमुळे त्यांची ओळख आहे. शिरूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या तालुक्यातील पोलीस प्रशासनाची धुरा सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद पाटील यांचे स्वागत केले आहे. वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि महामार्गावरील वाढती वाहतूक यामुळे शिरूर पोलीस ठाण्याची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत असून नव्या पोलीस निरीक्षकांसमोर अनेक आव्हाने असणार आहेत.

दरम्यान, शिरूर पोलीस ठाण्याच्या नव्या नेतृत्वाकडून गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत