तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

आरोग्य

आपले शरीर व्यवस्थितपणे काम करण्यासाठी हृदय निरोगी असणे फार गरजेचे असते. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या झटक्याने जगात सर्वाधिक मृत्यू होतात. दरवर्षी जवळपास जवळपास दोन कोटी लोकांना हार्ट अटॅकने आपले प्राण गमावावे लागतात. यादरम्यान आपण दररोज हृदयाची काळजी घेतल्यास हृदय विकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ देतात. हार्ट अटॅकचा झटका येण्याआधी शरीरात काही लक्षणे दिसून येतात; पण छातीत वेदना होणे हे त्याचे सामान्य लक्षण मानले जाते. काहींना छातीत वेदना जाणवत नसतानाही अचानक हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

हृदयविकाराची लक्षणे कोणती

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीत होणारी वेदना ही फार तीव्र नसते. फक्त आपल्या हृदयावर दबाव आल्यासारखे किंवा त्याला कुणीतरी पकडून ठेवल्यासारखे जाणवते, असे या आजाराचा तीनदा सामना करणाऱ्या व्यक्तीने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. हृदय विकाराचा झटका येत असताना अनेकदा छातीबरोबरच मानेभोवती आणि दोन्ही हातांमध्येही वेदना जाणवायला लागतात, असेही ते म्हणाले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते- हार्ट अटॅक येण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला चक्कर येणे, गरगर फिरल्यासारखे वाटणे, घामाघूम होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशीही लक्षणे जाणवायला लागतात. काही वेळा हृदय विकाराचा झटका अचानक येऊ शकतो, पण त्याची लक्षणे अनेक तासांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वीच दिसू लागतात. वेळेवर असामान्य लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकीय मदत घेतल्यास हृदयविकाराचा धोका टाळला जाऊ शकतो.

तरुणांमध्ये का वाढतोय हृदयविकाराचा धोका

मागील काही वर्षांत हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, त्यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बदलती जीवनशैली या घटनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याची चिंता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान यांमुळे धमन्यांमध्ये चरबी साचते आणि तरुणांमध्ये हृदय विकाराचा धोका वाढतो, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात. त्याशिवाय अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव, मोठ्या प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, आरोग्याकडे दुर्लक्ष यांसारख्या गोष्टी अशा विकारांना आमंत्रण देतात. त्याशिवाय ताणामुळे हृदयाच्या आरोग्यावर थेट आणि अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. उच्च ताण पातळी कॉर्टिसोल सोडण्याद्वारे रक्तदाब वाढवते आणि हृदय गती वाढवल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. भारतात वायुप्रदूषण जागतिक सरासरीपेक्षा तिपटीने जास्त आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका आणखीनच वाढत असल्याचे समोर आले आहे.

हृदयविकाराचा धोका नेमका कशामुळे वाढतो

हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. काहींना सकाळी ६-१० या वेळेत हृदय विकाराचा झटका येतो आणि त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. व्हिएन्ना जनरल हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हेगल यांनी १२,००० हून अधिक हृदय विकाराच्या प्रकरणांचा सखोल अभ्यास केला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका असतो. कारण, काही जण त्यांच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने नव्हे, तर ताणतणावाने करतात. सकाळी झोपेतून उठताच अचानक कामाला लागल्याने किंवा तणावाला सामोरे गेल्याने कोर्टिसोल हार्मोनसह मज्जासंस्थेवरील ताण वाढतो, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)