पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच आपले आवडते मुख्यमंत्री होते, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात माजी आमदार दिलीप देशमुख यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोहोळ बोलत होते.
महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना मोहोळ म्हणाले की, ‘‘मी जेव्हा महाविद्यालयात शिक्षण घेत होतो आणि भाजप युवा मोर्चाचे काम करत होतो, तेव्हा आमच्यासारख्या तरुणांसाठी महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा विलासराव देशमुख हेच होते.’’
विलासराव देशमुख आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचाही मोहोळ यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘‘मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून घडलो. मुंडे साहेब आणि विलासराव यांच्यातील मैत्रीमुळे आमच्या मनात विलासरावांबद्दल नेहमीच भावनिक धागा राहिला. मुंडे साहेबांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या दोघांचे झालेले भाषण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही,’’ असे त्यांनी सांगितले.
‘राजकारणाच्या मर्यादा त्या भाषणातून शिकायला मिळाल्या’
राजकारण कोणत्या मर्यादेपर्यंत असावे आणि कुठे नसावे, याची दिशा त्या भाषणातून कार्यकर्त्यांना मिळाली, असेही मोहोळ म्हणाले. वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षात काम करणारा युवक कार्यकर्ता म्हणून विलासराव देशमुख हे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक होते, असे त्यांनी नमूद केले.‘‘देवेंद्रजी यांच्याबरोबरच मला मनापासून आवडणारे दुसरे मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख साहेब,’’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, आपल्या या वक्तव्याची बातमी होईल याची पूर्ण कल्पना असूनही आपण हे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘मी केवळ आज कार्यक्रमाला आलो म्हणून हे सांगत नाही. माझ्या मित्रांना तुम्ही विचारू शकता. मी हे मनापासून बोलतोय,’’ असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.