पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन
चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू, साप आणि इतर किडे-किटक शिरण्याच्या घटना वाढत असतात. अशाच निष्काळजीपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे 12 वर्षीय मुलाला पँटमध्ये लपलेल्या विंचवाने दंश केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या उपचारांमुळे तब्बल 72 तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा जीव वाचला.
अनुप ईश्वर ढोणे (वय 12) हा मुलगा घरात खुंटीला टांगलेली पँट घालत असताना त्यामध्ये लपून बसलेल्या विंचवाने त्याला दंश केला. विषाचा तीव्र परिणाम झाल्याने त्याचा रक्तदाब शून्यावर आला. सुरुवातीला कुटुंबीयांनी ग्रामीण पद्धतीने उपचार करण्याचा प्रयत्न केल्याने मुलाची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर त्याला तातडीने चंद्रपूर येथील डॉ. आनंद बेंदले यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. बेंदले यांनी मुलावर अतिदक्षता विभागात तीन दिवस शर्थीचे उपचार केले. अखेर 72 तासांनंतर उपचारांना यश आले असून सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळाली आहे.
विंचू दंश झाल्यास काय करावे?
घाबरून न जाता रुग्णाला शांत ठेवा.
दंश झालेली जागा साबण व स्वच्छ पाण्याने धुवा.
बर्फ कापडात गुंडाळून 10–15 मिनिटे शेक द्या.
अंगठी, घड्याळ किंवा घट्ट कपडे काढून टाका.
तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी जा.
जखम कापणे, विष चोखणे किंवा दंशाच्या वर दोरी बांधणे टाळा.
घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पावसाळ्यात कपडे, शूज, वाहन किंवा घरातील कोपरे तपासूनच वापरणे, तसेच विंचू किंवा साप दिसल्यास सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.