मुंबई: शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत पक्षातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांमधील असंतोष दडपण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
उबाठा गटात सध्या ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सुरू असल्यासारखी परिस्थिती असून, खासदारांना दररोज निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणाभाका घ्याव्या लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. “खासदारांसाठी एक न्याय आणि युवराजांसाठी वेगळा का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
डॉ. वाघमारे म्हणाल्या की, उबाठा गट संशयाच्या गर्तेत अडकला आहे. खासदारांना निष्ठा सिद्ध करण्यासाठी आदेश दिले जात असताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत मात्र मौन का पाळले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट” असा दुहेरी न्याय पक्षात दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील नेतृत्वाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, बाळासाहेब सर्वांना समान वागणूक देत आणि शिवसैनिकांना संवगडी मानत. मात्र सध्याच्या नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना घरगड्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
उबाठा गटातील खासदारांची अवस्था संशयी नवऱ्यासोबत नाईलाजाने राहणाऱ्या स्त्रीसारखी झाली असून त्यांना वारंवार निष्ठा सिद्ध करावी लागत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.