१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

महाराष्ट्र

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे. या सेवेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच बीड–पुणे आणि बीड–मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी रेल्वे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी बीडसह मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वे जोडणीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली होती. आता याच ऐतिहासिक दिवशी बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू होणार आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

बीड–पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर बीडची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे जोडणी अधिक सक्षम होणार आहे. यामुळे कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्राला चालना मिळण्यासह नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१७ सप्टेंबरपूर्वी उर्वरित तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच बीड–मुंबई रेल्वे सेवा डिसेंबरअखेर सुरू करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करा, असेही पवार यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

“बीड–पुणे आणि पुढे बीड–मुंबई ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी या रेल्वे जोडणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत